Thursday, 29 December 2016

शब्द माझे सांगाती



शब्द माझे सांगाती


शब्दांचा खेळ हा सारा
शब्दातूनच मांडतो..
कधी शब्दासवे बोलतो
कधी शब्दासंगे भांडतो..


आनंदात जेव्हा शब्द असे
सोबत माझ्या तेही हसे..
रागवतात कधी शब्द माझे
मौन पाळून कोपऱ्यात बसे..


कधी आठवणींच्या झऱ्यामधे
शब्द माझे अलगद वाहतात..
कितीही एकटे वाटले तरीही 
शब्द माझे पाठीशी राहतात..


विरहच्या दुःखात सुद्धा 
शब्दच मला साथ देतात..
भावूक झालेल्या मनाला
शब्दच मग कवेत घेतात..


राहवत नाही मला शब्दांशिवाय
तेच माझे सखा, तेच माझे सोबती..
कवितांच्या माझ्या विश्वात
शब्द माझे सांगाती..


- निनाद वाघ




Saturday, 8 October 2016

हॉस्पिटल .. नको रे बाबा..




हॉस्पिटल .. नको रे बाबा..


नको रे बाबा त्या हॉस्पिटलचं घेऊ नाव
आजारी इसम जेथे घेई धाव..
आठवतात मग ती माणसं सगळी 
प्रत्येकाची कथा वेगळी..
प्रत्येकाची व्यथा वेगळी..


कुणाला इथे हृदयाचा आजार 
कुणी मात्र तापानं बेजार..
गुडघे दुखीनं म्हातारा त्रस्त
आजीबाई तिथं दम्यानं ग्रस्त..
एकाच ठिकाणी ही माणसं सगळी 
प्रत्येकाची कथा वेगळी..
प्रत्येकाची व्यथा वेगळी..


कुणी दोन पायावर चालत येई
अन् चार खांद्यावर विलीन होई..
कुणी नुसतं खाटेवर पडूनी
स्वास्थ्य सुधारण्याची वाट पाही..
घरची ओढ इथं प्रत्येकाला लागली
प्रत्येकाची कथा वेगळी..
प्रत्येकाची व्यथा वेगळी..


देवा सारखे इथे असतात डॉक्टर 
मदतीला धावून येणारी ती सिस्टर..
म्हणतात मिळून आपण उपचार करू
औषधांचा मारा मग होतो सुरू..
करतात येथे नुसती धावपळ सगळी 
प्रत्येकाची कथा वेगळी..
प्रत्येकाची व्यथा वेगळी..


काही जगतात काही मरतात 
काही मरणाच्या दारावर नुसतेच झुरतात..
नकोशी वाटणारी, ही दुनिया आहे आगळी
प्रत्येकाची कथा वेगळी..
प्रत्येकाची व्यथा वेगळी..



- निनाद वाघ




Sunday, 25 September 2016

रजनीचं नेमकं काय झालं?



सकाळपासून हाच विचार करतोय की रजनीची सुटका झाली असेल का..ती सुखरूप घरी पोहोचली असेल का?
आज सकाळी बसमध्ये बसलो होतो. दोन माणसं मागच्या सीटवर बसून बोलत होती. त्यांचं बोलणं कानावर पडत होतं. त्यातला एकजण म्हणाला की त्यानं रजनीला फोन केला होता तेव्हा ती खूप टेंशनमध्ये होती. बॕग भरत होती. तिचा जीव घुसमटत होता. घरातून पळून जायच्या तयारीत होती. फक्त संधी शोधत होती. बस मधला माणूस बहुधा तिचा भाऊ असावा. घरातून पळून ती त्याच्या घरीच येणार होती.
रजनीची घुसमट का होत असावी? तिला पळून जायची संधी मिळाली असेल का? पळून जाणं हे तिच्यासाठी योग्य होतं का? असेल तर मग ती सुखरूप घरी पोहोचली असेल का? कुठल्याच प्रश्नांची उत्तरं नाहीत आत्ता. कशाचीही कल्पना नाही.
कधीकधी कसलाही आगा-पिछा नसताना एखादी गोष्ट कानी पडते आणि मग विचार चक्र सुरू होतं.
काय झालं असेल रजनीचं हे माझ्या नजरेतनं बघा..

पाच वर्षांपूर्वी पराग मुंबईला नोकरीसाठी आला तेव्हा रजनी कॉलेजात शिकत होती. परागचा आपल्या बहिणीवर खूप जीव होता. आईवडील गेल्यानंतर परागनं नोकरी करत रजनीला सांभाळलं. वर्षभरात आपलं शिक्षण पूर्ण करून रजनीसुद्धा मुंबईला आली.
रजनी आणि पराग ह्या दोघांचं आयुष्य कधीच सरळ सोपं नव्हतं. आईवडील अचानक अपघातात गेले. पराग तेव्हा दहा वर्षांचा होता आणि रजनी जेमतेम चार वर्षांची. सगळी जबाबदारी परागच्या इवल्याशा खांद्यावर आली. दुःख बाजूला सारून त्यानं ती जबाबदारी पेलली. वयाच्या बाराव्या वर्षी त्याला नोकरी करावी लागली. शिक्षणाची आवड असून देखील आपलं शिक्षण पूर्ण करू शकला नाही. कष्टापरी कष्ट केले त्याचा देह चंदनापरी झिजला. तरीही तो खचला नाही. रडला नाही. रजनीचं शिक्षण पूर्ण केलं. तिलाही मुंबईत घेऊन आला.
रजनीनं सुध्दा भावाला खूप मदत केली. बारा वर्षाचा पराग जेव्हा नोकरी करत होता तेव्हा शाळेत जाणारी रजनी घरोघरी जाऊन धुणी-भांडी करायची. दोघांचं बालपण कष्ट करण्यात गेलं. जेव्हा त्यांच्या वयाची मुलं खेळात रमायची तेव्हा हे दोघे जगण्यासाठी झगडत होते.
आता दोघे मुंबईत सेटल झाले होते. भाड्याने एक छोटी रूम घेतली होती. बघता बघता रजनीचं लग्न ठरलं. मुलगा मुंबईचाच होता. लग्न अगदी साधेपणानं पार पडलं. एका मोठ्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानं परागलाही हलकं वाटलं. आनंद तर होताच.
रजनीचा संसार सुरू झाला. सहा महिने सगळं सुरळीत सुरू होतं. रजनी खूप आनंदात होती. रजनीचा नवरा नोकरी निमित्त फिरतीवर असायचा. दिल्ली मुंबई प्रवास तर नेहमीच व्हायचा.असाच तो एकदा दिल्लीला गेला होता. तिथून मुंबईला परतताना विमानाचा अपघात झाला. सर्व प्रवासी जागीच ठार झाले.
रजनीला हा धक्का पचवणे फार कठीण होते. ती पार कोलमडून गेली होती. पुन्हा एकदा आयुष्यानं तिला एका अनवट वळणावर आणून ठेवले होते. जिथून पुढं सगळं धुसर दिसत होतं पण चालणं अनिवार्य होतं.
तिला आता सासरी जगणं फार कठीण होत होतं. रजनीची काहीच चूक नसताना तिचे सासू सासरे आपल्या मुलाच्या मृत्यूला तिलाच जबाबदार धरत होते. तिच्यातच काहीतरी दोष असणार म्हणून तर आधी स्वतःच्या आईवडीलांना गिळलं आणि आता आमच्या मुलाला, असं तिचे सासू सासरे म्हणायचे. चार चौघात सारखा तिचा अपमान करायचे. हे सगळं रजनीच्या सहनशक्तीच्या बाहेर जात होतं.
एकीकडे सासू सासऱ्यांचा जाच तर दुसरीकडे नवऱ्याच्या आठवणी. तिचा जीव घुसमटत होता. तिला हे घर सोडून जायचं होतं पण फक्त एका संधीची वाट पाहत होती. तिने तिच्या भावाला तसं कळवलं. त्यालाही तिची घुसमट समजली. तो तिच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा राहिला. त्यानं तिला माहेरी यायला सांगितलं. माहिती नाही का पण आपल्या सासू सासऱ्यांना सांगून जायची तिच्यात हिम्मत नव्हती. तिने बॅग भरली आणि घरी कुणी नसताना तिथून निघाली ते कायमची. माहेरी आल्यावर पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभी राहिली. नोकरी पुन्हा सुरू केली. काही काळ ती जरा खचली होती पण त्यात अडकून राहिली नाही. दुःख कुरवाळत बसली नाही. पुन्हा उभारी घेतली अन् स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. 
दुःख कमी जास्त प्रमाणात सर्वांना असतं म्हणून नशिबाला दोष देऊन किंवा खचून जाऊन प्रश्न सुटत नाही. रजनीच्या जागी दुसरं कुणी असतं तर जीव दिला असता कदाचित. नशिबाची साथ तिला कधीच नव्हती पण तरीही नशिबाला दोष देण्यापेक्षा ती त्याला सामोरी गेली आणि स्वतःचा मार्ग निवडला.



-निनाद वाघ
www.shabdatmandatomi.blogspot.in




Monday, 12 September 2016

CODE मंत्र : एक अनुभव



जूनमधे CODE मंत्र ह्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग झाला तेव्हापासून ह्या नाटकाबद्दल ऐकून होतो. नाटक छान आहे किंवा सगळ्यांची कामं छान झाली आहेत वगैरे. इतकी तगडी स्टार कास्ट असल्यावर नाटक वाईट असेल अशी शंका नव्हतीच मुळी. नाटक पाहण्याची उत्कंठता मात्र दिवसेंदिवस वाढत होती आणि अखेर काल यशवंत नाट्यमंदिरात ह्या नाटकाचा प्रयोग पाहण्याची संधी मिळाली. खरंच हे नाटक म्हणजे एक विलक्षण अनुभव आहे जो शब्दात मांडणं कठीण आहे.
कर्तव्य आणि कर्तव्याचा अतिरेक ह्यातली पातळ सीमारेषा ह्यावर भाष्य करणाऱ्या ह्या नाटकाची मांडणी खरंच खूप प्रभावी आहे. नाटकाचा पडदा उघडतो ते नाटक संपेपर्यंत प्रत्येक क्षण म्हणजे कानांना आणि डोळ्यांना पर्वणीच जणू. नाटकाचा पेस सुद्धा अगदी परफेक्ट सेट केलाआहे. अजय पूरकर ह्यांनी साकारलेली प्रतापराव निंबाळकर ही व्यक्तीरेखा तर कायमच लक्षात राहील. मुक्ता बर्वे नेहमी प्रमाणे उत्कृष्ट आहेच. मुक्ता बर्वे आणि अजय पूरकर ह्यांनी सर्वार्थाने त्यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. दुसऱ्या अंकात ह्या दोघातले संभाषण संवाद तर लाजवाब. उमेश जगताप, अतुल महाजन, कौस्तुभ दिवाण, विक्रम गायकवाड सह इतर कलाकारांचं काम सुध्दा अप्रतिम झालं आहे.
स्नेहा देसाई ह्यांचं मूळ लिखाण इंग्रजी कथानकावरून प्रेरित आहे आणि विजय निकम ह्यांनी त्याचं छान रूपांतर केलं आहे. राजेश जोशी ह्याचं दिग्दर्शन, प्रसाद वालावलकरांच नेपथ्य आणि सचिन जिगर ह्यांच्या पार्श्वसंगीत ह्याने ह्या कलाकृतीला चार चांद लावले. अक्षरशः रंगभूमीवर रणभूमी उभी केली आहे ह्या मंडळी ने. नाट्यगृहातलं वातावरण संमोहित करणारं आहे.
खरंच हे नाटक पाहून आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. आकर्षित होतो. पुन्हा पुन्हा पाहवंसं वाटतं. CODE मंत्रच्या संपूर्ण टीमचं कौतुक करावं तितकं थोडं. इतक्या भव्य नाटकाचा भार ह्या टीमनं अगदी लीलया पेलला आहे.
काही गोष्टी आयुशभर हृदयात घर करून राहतात. त्यातलच हे एक नाटक. तुम्ही सुध्दा हे नाटक एकदा तरी नक्की पहा आणि तो सुकर अनुभव घ्या. 




HATS OFF TEAM CODE मंत्र ..



जय हिंद..










- निनाद वाघ

Friday, 29 July 2016

चारोळ्या..



मनातील गोष्ट आज मनात राहून गेली..
आठवणींच्या झर्‍या मधून नकळत ती वाहून गेली..
********************************************

मनात विचार अनेक आहेत
पण शब्द काही सुचत नाही..
हातात लेखणी असून देखील
कागदावर काही उतरत नाही..
********************************************

कुणा एकाच्या सुखासाठी
दुःख आपल्याला सोसावं लागतं..
जसं माणसांच्या आनंदासाठी
ढगांनाही रडावं लागतं..
********************************************

कोसळणाऱ्या पावसाकडे
नुसतं पाहत बसावं..
झेलताना तो प्रत्येक थेंब
मनमोकळं हसावं..
********************************************

जेव्हा असते साथ कुणाची
तेव्हा पावसात सुध्दा रंगत असते..
रटाळ वाटतो हाच पाऊस
जेव्हा कुणाचीच आपल्याला संगत नसते..
********************************************

सुख- दुःख

भास होतो सुखाचा
आनंदी राहते मन..
मग आठवण होते दुःखाची
अन् विस्कटतं सारं जीवन..

सुखाच्या शोधात मग
सुरू होते माझी वारी..
पण सुख आले जेव्हा दारी..
तेव्हा कुरवाळत बसलो होतो
माझी दुःख सारी..
********************************************
दृष्टी नाही तर दृष्टिकोन बदला
म्हणजे सुंदर दिसतील सर्व दृश्य..
इतरांना नको तर स्वतःला बदला
मग बघा किती छान वाटेल आयुष्य..
********************************************
आयुष्यात सरणारा प्रत्येक क्षण
मनात घर करून राहतो..
काळांतराने त्याकडे आपण
आठवण म्हणून पाहतो..
********************************************
आपलं नशीब आपल्या हाती
दोष इतरांना देऊ नका..
आपण घडवू तसंच घडेल आयुष्य
रोष इतरांवर काढू नका..
********************************************
हे आयुष्या.. जरा जपून..
किती रे सुसाट पळशील..
सरळ मार्गी जाताना..
तू मात्र अचानक वळशील..
********************************************
शब्द ही मुके होतात
आठवणींमधे भिजताना..
आभाळाकडे पाहत
पाऊस कवेत घेताना..



- निनाद वाघ

www.shabdatmandatomi.blogspot.in



Friday, 8 July 2016

अंधश्रद्धा


मागच्या शनिवारची गोष्ट. आईनं दिलेल्या सामानाची यादी घेऊन मी बाजारात गेलो होतो. बाकी वस्तूंसोबत मी दुकानदाराकडे एक लिटर तेलाचा कंटेनर मागितला तर दुकानदार मला म्हणाला, “साहेब आज शनिवार आणि शनिवारी तेल विकत घेऊ नये. तुम्ही उद्या या”
मी म्हटलं त्याला की बाबा रे ह्या गोष्टी मी काही मानत नाही. तरीही त्याचं म्हणणं होतं की आज नकोच.
आता काय बोलणार ह्या प्रकाराला. त्यानं स्वतःचं नुकसान करून घेतलं पण मला तेल विकत घेऊ दिलं नाही. बरं तिथून घरी जाता जाता सलून मध्ये केस कापून जाऊया म्हटलं तर तितक्यात एक ओळखीचे गृहस्थ भेटले. माझी विचारपूस करताना त्यांच्या लक्षात आलं की मी केस कापायला निघालो आहे. मग काय..तेही सुरू झाले ना राव..शनिवारी केस कापू नये वगैरे वगैरे आणि इच्छा नसतानाही माझी सलूनकडे जाणारी पावलं घराकडे वळवावी लागली.
खरंतर ह्या सगळ्या मागे काय लॉजिक आहे हेच मला समजत नाही. शनिवारी मीठ तेल आणू नये किंवा जेवणात तीन पोळ्या वाढू नये. दारात शिंकू नये वगैरे असे अनेक गैरसमज लोकांच्या मनात घर करून आहेत. पिढ्यांपिढ्या त्या सुरू आहेत. लहानपणापासून ह्या गोष्टी आपल्या मनात ठासून भरल्या जातात आणि मनात आयुष्यभर एक भीती निर्माण होते. भीती होणाऱ्या नुकसानाची.अशी भीती की जर मी ती गोष्ट पाळली नाही तर काही संकट येऊ शकतं. काहींना तर ही अंधश्रद्धा आहे हे माहिती असून देखील उगाच रिस्क कशाला म्हणून पाळतात. हो आणि जर काही एखाद्याने नियम मोडला तर मग त्यावरचे उपाय अजून विचित्र. जसं उदाहरणार्थ जर दारात कुणी शिंकलं तर लगेच तिथे पाणी शिंपडा म्हणजे अपशकून टळेल.खरंच?
अशा लोकांना आपण जर काही समजवायला गेलो तर ते आपल्याशी वाद घालतील आणि काही विसंगत उदाहरण देऊन स्वतःच बरोबर म्हणून जाहीर करतील. त्यामुळे आपणच मूर्ख ठरतो.
आपल्याला खरंतर श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यातील फरक समजायला हवा. देवावर विश्वास ही श्रद्धा पण देवाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी केलेला आटापिटा म्हणजे अंधश्रद्धा. श्रद्धेनं देवाची पूजा करणे किंवा देवळात जाणे ह्यात काहीच चूक नाही. त्याने आपल्याला मानसिक बळ मिळतं. पण त्याचं रूपांतर अंधश्रद्धेत होऊ देऊ नका. जर अमूक गोष्ट केली तर आपलं काम होणार किंवा मांजर आडवी गेली तर काम होणार नाही वगैरे ह्यात काहीच तथ्य नाही आणि जरी तसं घडलं तरी तो केवळ योगायोग असतो हे लक्षात घ्यायला हवं.
अंधश्रद्धा ही समाजासाठी घातक आहे. अंधश्रद्धेतनं माणसं अघोरी कृत्य ही करतात. ज्या दिवशी ही विचारसरणी बदलेल तेव्हा ती समाजात घडणाऱ्या बदलाची नांदी असेल. भीतीवर मात करता आली पाहिजे नाहीतर हे चक्र असंच सुरू राहिल. आपलं नशीब आपल्या हातात असतं. ते आपणच घडवतो. हेच सत्य आहे.
हे लिहून जेव्हा चहा पीत खिडकीत उभा होतो तेव्हा एक माणूस बिल्डिंगमध्ये शिरताना त्याला एक मांजर आडवी जाणार होती तर तो माणूस झटकन उडी मारून मांजरीलाच आडवा गेला.


- निनाद वाघ



Friday, 1 July 2016

जोशी काका


रोज सायंकाळी साडेपाच वाजता मी शिवाजी पार्कच्या उद्यान गणेश मंदिरात जात असे. आजही गेलो. गणपती बाप्पांचे दर्शन घेतले अन् मंदिरा समोरच्या कट्ट्यावर जाऊन बसलो. आज जोशी काका मात्र कुठं दिसत नव्हते. तसं सहसा त्यांना कधीही उशीर व्हायचा नाही पण आज नेमका झाला.मी त्यांना जरी रोज भेटत असलो तरी आजचा दिवस मात्र खास होता आणि म्हणूनच मी त्यांच्या येण्याची वाट पाहत बसून राहिलो.
माझी जोशी काकांशी ओळख झाली ती साधारणतः पाच वर्षांपूर्वी इथंच ह्याच कट्ट्यावर.जोशी काका म्हणजे एक सामान्य दिसणारे असामान्य व्यक्तिमत्त्व. अगदी साधारण राहणीमान परंतु विचारांची श्रीमंती असणारा माणूस.सदा हसतमुख.
ओळख वाढली तशी आमच्यात मैत्री झाली.आमच्यात जवळजवळ चार दशकांचा फरक होता पण मैत्रीला वयाची मर्यादा कधीच नसते हेच खरं!
काळा सोबत आमची मैत्री अधिक घट्ट होत गेली. मी त्यांच्या कडून खूप काही शिकलो.आयुष्य हसत खेळत कसं जगावं हे त्यांनी मला शिकवलं. कितीही कठीण प्रसंग आला किंवा कसली समस्या असो, त्याला ते अगदी हसत हसत सामोरे जायचे आणि त्यावर मात करायचे. कुठल्याही गोष्टीचा ताण न घेता ही आयुष्य अगदी सुंदर आणि यशस्वीपणे जगता येतं हे त्यांनीच मला दाखवून दिलं. टेंशन घेऊन प्रश्न सुटत नाहीत तर ते अधिक गुंतले जातात अशा मताचे ते होते.
त्यांना मनं जिंकणं अगदी सहज जमायचे.म्हणजे समोरच्या व्यक्तीला न दुखावता ही आपलं म्हणणं त्या पर्यंत सहज पोहोचवायचे. आणि म्हणूनच की काय त्यांचे शत्रू कोणीच नव्हते. जे होते ते फक्त मित्र.
मला ते प्रेमाने बंड्या म्हणून हाक मारायचे.आम्ही रोज कट्ट्यावर बसून गप्पा मारायचो.
आज फ्रेंडशिप डे होता म्हणजेच मैत्री दिन. त्यांच्या साठी मी एक खास भेटवस्तु आणली होती. आपल्याला आयुष्यात मित्र अनेक भेटतात पण खरा मित्र सापडायला भाग्य लागतं. मला ते भाग्य लाभलं म्हणूनच तर जोशी काका सारखे मित्र भेटले. मला माझ्या सुख दुःखात साथ देणारे. योग्य मार्ग दाखवणारे सोबती. खरंच ते एक गोड नातं होतं.एक गोड मैत्री.
त्यांची वाट पाहताना तास कसा उलटला समजलंच नाही.पण त्यांचा मात्र अजूनही काहीच पत्ता नव्हता. आज बहुधा त्यांना न भेटता जावं लागणार होतं.फार उशीर झाला होता. मी घरी जायला निघालो. चार पावलं चाललो इतक्यात काही लोकांची गर्दी दिसली. कुणाची तरी अंतयात्रा निघाली होती. अशा प्रसंगी माझं मन नेहमी हळवं होतं पण माणूस जन्माला येतो तो एक ना एक दिवस मरण पावणार हे निश्चित असतं म्हणूनच त्याला निरोप डोळ्यात अश्रू आणून नव्हे तर हसत हसत द्यावा हेही मला जोशी काकांनीच शिकवलं.
मी हळुहळु चालत राहिलो.चालता चालता सहज नजर पडली ती घेऊन जात असलेल्या प्रेतावर. पाहिलं आणि पायाखालची जमीन सरखली.मृत पावलेली व्यक्ती जोशी काका होती.माझ्या काळजाचा ठोका चुकला.काहीच सुचेना.कट्ट्यावर वाट पाहताना त्यांनी भेटावं अशी इच्छा होती पण ती भेट अखेरची असेल हे माहिती नव्हतं.कायम हसतमुख असणारे जोशी काका आपल्या मृत्यू शैय्येवर सुद्धा हसत झोपले होते. बहुधा मृत्यूला ही ते हसता हसता सामोरे गेले असावेत.
मनात भावना दाटल्या होत्या. देवाने इतकं क्रूर तरी का वागावं? आभाळाला ही भरून आलं अन् तेही कोसळू लागलं.मी आणलेली भेटवस्तु त्यांच्या पायाशी ठेवली आणि वळलो तेव्हा मागून आवाज आला, “थँक्स बंड्या” अन् माझी पावलं नकळत त्यांच्या अंतयात्रेत सामील झाली.



- निनाद वाघ



Friday, 24 June 2016

सिंप्ली डेलीशियस


मी लहानपणापासून खाण्याचा खूपच शौकीन आहे. जितकं मला आईच्या हातचं जेवण आवडतं तितकंच मला निरनिराळ्या हॉटेलात, फूड जॉईंट्स मधे जाऊन खायला तसेच नवनवीन पदार्थ टेस्ट करायला आवडतात. कॉलेजात असताना सुद्धा मी वर्गात जितका नसायचो त्याहून जास्त कँटीन मधे असायचो. आता विचार करा अशी आवड असताना जर मित्राचंच हॉटेल असेल तर मग अजून काय हवं?
सत्यजित धारगळकर हा माझा अगदी जुना आणि खास मित्र. आमची कॉलेजात जायच्या अगोदर पासून ओळख असली तरी कॉलेजात गेल्यानंतर आमची खऱ्या अर्थाने घट्ट मैत्री झाली जी आज पर्यंत टिकून आहे. कधीही काही मदत लागली तर हक्कानं मी त्याच्या घरी जातो. त्याचे आई बाबा सुध्दा मला अगदी घरातल्या सारखंच वागवतात. आमचं काही रोज बोलणं किंवा भेट होत नाही पण एकमेकांच्या मदतीला मात्र आम्ही नेहमी सज्ज असतो.
धारगळकर कुटुंबाचा बेकरी व हॉटेल व्यवसाय आहे. सत्यजित सुध्दा त्यात अगदी आवडीने आणि नेटाने लक्ष घालतो. प्रसाद बेकरीची प्रॉडक्ट्स तर गेली अनेक वर्षे लोकं आवडीने खात आहेत. माहीम दादर भागात क्वचितच लोकं असतील ज्यांना प्रसाद बेकरी माहीत नसेल. त्यांची टोस्ट व खारी बिस्किटं खावी तितकी कमी. फारच अफलातून असतात.
तसंच सिंप्ली डेलीशियस (Simply Delicious) हे हॉटेल. उडपी पंजाबी तसंच चायनीज जेवण इथं मिळतं. चवदार चविष्ट असं हे जेवण असतं. इथे दुपारी व संध्याकाळी प्रचंड प्रमाणात गर्दी असते. मी सुद्धा अनेकदा इथंच जेवतो. निमित्त वेगवेगळी असली तरी ठिकाण हेच. इथली चीझ पाव भाजी तर माझी ऑल टाईम फेवरिट आहे. घरी पार्सल तर इतक्या वेळा मागवतो इथून की तिथली माणसं आता मला नुसत्या आवाजानं ओळखतात.
माहीमच्या बॉम्बे स्कॉटिश शाळेच्या बाजूला ही बेकरी आणि हॉटेल आहे. माझ्या आवडीचं ठिकाण.
चला मी आता जरा पेट पूजा करून घेतो तो पर्यंत तुम्ही सुद्धा चवीनं खा आणि आनंदी रहा.



- निनाद वाघ



Friday, 17 June 2016

बंधन


जर एखाद्या पक्ष्याचे दोन्हीही पाय दोरखंडानं झाडाला बांधले आणि मग त्या पक्ष्याला गगनात भरारी घ्यायला सांगितले तर त्या पक्ष्याला ते शक्य होईल का?
बरं मग भरारी घेता येत नाही ह्यात चूक कोणाची? पाय बांधले त्या व्यक्तीची की त्या पक्ष्याची?
ह्यावर नक्की विचार करा कारण माणसांच्या आयुष्यात ही अनेकदा असंच घडतं की.
माणूस हा अनेकदा नात्यांच्या रूढी परंपरेच्या समाजातील प्रतिष्ठेच्या दोरखंडाने असा काही बांधला गेलेला असतो की स्वतःचं ध्येय गाठणं अन् महत्त्वकांक्षा पूर्ण करणं त्याला कठीण होऊन बसतं. तेव्हा दोरखंड तुटल्या वाचून पर्याय नसतो. पण ते देखील त्याला सहज शक्य नसतं कारण तोवर तो पूर्णतः नात्यांच्या बंधनात अडकून गेलेला असतो आणि म्हणूनच तो आपल्या ध्येयाच्या विरूध्द दिशेनं प्रवास सुरू करतो. इतरांना आनंदी ठेवताना स्वतः दुःख सहन करतो. त्रागा करतो. मग पुन्हा लोकं विचारात की इतकं सगळं छान असून देखील कायम दुःखी त्रासलेला का असतोस? तेव्हा त्याच्याकडे उत्तर नसतं आणि हे चक्र असंच सुरू राहतं.
बंधन तोडा. ध्येय गाठा. स्वप्न पूर्ण करा.


बंधन


कधीकधी मलाही वाटतं 
मनमोकळं वागावं..
तोडून सारी बंधनं
मनसोक्त जगावं..

पण बंधनं सारी मीच ठरवली
ती तोडू तरी कशी?
मर्यादा माझी मीच ठरवली
ती ओलांडू तरी कशी?

हेच कारण असेल कदाचित 
माझ्या अलिप्त राहण्याचं..
सुखात असून सुद्धा 
कायम दुरमुखलेला दिसण्याचं..

- निनाद वाघ




Friday, 10 June 2016

कातरवेळ


संध्याकाळी थकून घरी परत येत होतो. दिवसभराचा थकवा झटकून टाकायला समुद्र किनारी जाऊन बसलो. तिथे सुचलेले शब्द..

कातरवेळ

गडद केशरी आभाळ
अथांग सागर पसरलेला
किनाऱ्यावर येती लाटा
अन् सूर्य क्षितिजावर बसलेला

पाहताना हे अद्भुत दृश्य
वाटते आयुष्य व्हावे स्तब्ध
नेत्र ही पाणावतात
मन होते निशब्द

बघता बघता निसर्गाचा
सुरू होतो एक सुंदर खेळ
पाहता पाहता डोळ्यांसमोर 
सरते ती कातरवेळ..


- निनाद वाघ




Friday, 3 June 2016

देवा तुला शोधू कुठं?



मागे देऊळ नावाचा एक सिनेमा आला होता. त्यात एक गाणं होतं की “देवा तुला शोधू कुठं” आठवतं?
खरं तर हा प्रश्न सध्या मला पडला आहे. देव आहे की नाही हा मुळात इथला वाद नाहीच कारण देव अस्तित्वात आहे हे मानणाऱ्यांपैकी मी एक. फक्त तो कुठे आणि कोणत्या स्वरूपात आहे हा काय तो मुद्दा.
अनेकांच्या सांगण्यावरून मी देवाला शोधण्यासाठी अनेक मंदिरं पालथी घातली. अनेक देऊळांना भेट दिली. पण त्याचे काही दर्शन झाले नाही. अनेक धार्मिक स्थळं फिरून आलो. तासंतास रांगा लावल्या तसंच अनेक पूजा अर्चा केल्या पण त्याच्याशी काही भेट होईना. मनात विचार आला की मी इतकं सगळं करून सुद्धा मला देव का नाही सापडत?
हा प्रश्न मला कायम सतावत होता. एके दिवशी रेडिओ लावला तेव्हा ग. दि. माडगूळकरांचे शब्द कानावर पडले:

नसे राऊळी वा नसे मंदिरी
जेथे राबती हात तेथे हरी..

हे शब्द ऐकताच माझ्या लक्षात आलं की मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर सापडलं. माझ्या हेही ध्यानात आलं की देवाला शोधायचा माझा मार्गच चुकला होता.
नंतर बाबा आमटे, प्रकाश आमटे, मदर टेरेसा ह्या सारख्या अनेक महान व्यक्तींच्या कार्या बद्दल वाचले आणि लक्षात आले की ज्या देवाला मी देऊळात शोधत होतो तो तर इथं ह्यांच्या ह्दयात आहे. प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या त्या प्रत्येक माणसात देव आहे.
खरं सांगायचं तर देव म्हणजे काय तर ती एक शक्ती आहे जी आपल्याला बळ देते. आपला आत्मविश्वास वाढवते. हरलेल्याला जिंकण्याची नवी उमेद देते. नवी ऊर्जा देत आयुष्य जगायला शिकवते. अशी ही अद्भुत शक्ती म्हणजे देव. ही शक्ती अफाट आहे. त्यात परिवर्तनाची ताकद आहे. पण आपण ह्या शक्तीला अन् त्या ऊर्जेला दगडांच्या मूर्ती मध्ये दांबून ठेवतो आणि तिथेच शोधत राहतो. अशाने तो काही सापडायचा नाही.
देवाला शोधताय तर त्याला माणसांमध्ये शोधा. तुमच्या मध्ये माझ्या मध्ये शोधा. माणसाच्या श्रमात शोधा. समोरच्या व्यक्तीच्या वाणीत शोधा. गरिबांमध्ये शोधा. श्रीमंतांमध्ये शोधा. निसर्गात शोधा. स्वतः मध्ये शोधा. तो नक्की सापडेल कारण देव सर्वत्र आहे.



- निनाद वाघ



Friday, 27 May 2016

भावपूर्ण श्रद्धांजली



गेले दोन महिने हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारावर झुरत असलेल्या माझ्या आजोबांचा ८३ वर्षांचा जीवन प्रवास काल अखेर संपला. ते अनंतात विलीन झाले. त्यांची ही साथ सुटली ह्याचं अपार दुःख मनात होतं पण त्याहूनही त्यांची वेदनेतून सुटका झाली ह्याचं काय ते समाधान. ह्या दोन महिन्यात त्यांना खूपच सोसावं लागलं. त्यांना काही सहज मरण नशिबी नव्हतं.
माझं आणि माझ्या आजोबांचं असं एक छान सुंदर नातं होतं. आमचं असं एक वेगळं विश्व होतं. ह्या विश्वात होते ते दोन पक्के मित्र. आमचं हे मैत्रीचं नातं काळा सोबत अधिक बहरत गेलं. अधिक घट्ट होत गेलं. आम्हा दोघांना क्रिकेटचं फार वेड. प्रत्येक सामना आम्ही तहान भूक हरपून फॉलो करायचो. त्या नंतर आमचं चर्चा सत्र चालायचं तासंतास. कोण कसं खेळलं ह्यावर. ते कॉलेजात क्रिकेट टीम मधे होते. तेव्हाचे रंगतदार किस्से त्यांच्या मुखातनं ऐकायला तर फार मज्जा यायची.
त्यांचं बरंच आयुष्य गिरगावच्या चाळीत गेलं. त्यांचं बालपण शाळा सर्व गिरगावात. त्या मुळं माहिमला राहायला लागले तरीही त्या गिरगावच्या आठवणींमधे ते रमायचे. आम्हाला सांगायचे. मग आम्ही सुध्दा अगदी तिथेच आहोत असं वाटायचं. त्यांच्या नजरेतनं मी चाळीतलं जीवन कसं असेल ह्याचा अनुभव अनेकदा घेतला.
आमच्या विश्वात आता मात्र सर्वत्र अंधार पसरला आहे. कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.आता आठवणींच्या हिंडोळ्यावर झुलताना आठवणार ते सोबत घालवलेले ते मौल्यवान क्षण, त्यांच्या सोबत कायम असणारा त्यांचा रेडिओ, त्यांची आवडती बिर्याणी आणि असं बरंच काही. ते आम्हाला जरी सोडून गेले असले तरी त्यांचं माझ्या हृदयातलं स्थान कधीच कमी होणार नाही किंबहुना ते अधिक भक्कम होईल.


आज मला पाडगावकरांच्या कवितेतल्या ओळी आठवतात:

आजोबांच्या खोलीत आता धुकं धुकं धुकं..
आजोबांचं जग आता मुकं मुकं मुकं..



- निनाद वाघ



Friday, 20 May 2016

गोष्ट एका रात्रीची


रात्रीची वेळ. साधारणतः दहा वाजले होते. जेवणानंतर असाच एक फेरफटका मारायला म्हणून मी घरून निघालो आणि चालत चालत पोहोचलो ते शिवाजी पार्क जवळच्या चौपाटीवर. तिथल्या खडकावर जाऊन बसलो. एरवी गजबजलेली मुंबई रात्री मात्र अगदी शांत आणि सुरेख वाटत होती. आसपास फारशी माणसं नव्हती. मागील रस्त्यावर गाड्यांची ये जा ही नव्हती. होती ती फक्त निरव शांतता आणि सोबतीला आकाशात पसरलेलं छान शुभ्र चांदणं. किनाऱ्यावर येणाऱ्या प्रत्येक लाटेसह होणाऱ्या पाण्याच्या स्पर्शानं मन प्रफुल्लीत होत होतं. त्या रात्रीची जादू काही औरच होती.
अशा ह्या वातावरणात मीही हरवून गेलो. अशा बेभान अवस्थेत अचानक कानावर काही मधुर स्वर पडले. दूरवर कुठंतरी कुणीतरी आपल्या सुमधुर स्वरात गात असावं. इतक्या रात्री कोण बरं गात असेल ह्याचं कुतूहल वाटत होतं. त्या आवाजाच्या दिशेनं माझी पावलं वळली. जसा जसा पुढं जात होतो तशी मनाची उत्सुकता वाढत होती. शेवटी एका ठिकाणी पोहोचलो. समोरच्या एका खडकावर एक म्हातारा इसम दिसला. एखाद्या शास्त्रीय गायकाला शोभेल असाच काहीसा पोशाख. त्यांचा आवाज, तो स्वर मंत्रमुग्ध करणारा होता. अशा चांदण्या रात्री समुद्र किनारी असं गाणं म्हणजे कानांना खरंच पर्वणी. अहाहा!
मी अगदी तल्लीन होऊन त्यांचं गाणं ऐकत होतो. ते ही अगदी उत्साहाने गात होते. गाता गाता त्यांची नजर माझ्यावर पडली तसे ते थांबले. 
मी म्हणालो, “पंडितजी गाणं थांबवू नका. गात रहा. तुमच्या आवाजात जादू आहे. ह्या मैफीलीनं माझे कान तृप्त झाले.”
मग पुढचा तास दीड तास त्यांचं गाणं अगदी मन भरून ऐकत होतो. त्या नंतर आमच्या गप्पा रंगल्या. ते सांगत होते अन् मी ऐकत होतो. त्यांनी त्यांच्या काळातले गाण्याच्या कार्यक्रमातले किंवा रेकॉर्डिंगचे गमतीदार किस्से सांगितले. गायक म्हणून केलेला प्रवास त्यातल्या चांगल्या वाईट गोष्टी त्याही सांगितल्या. मलाही गमंत वाटत होती आणि त्यांच्या जीवन प्रवासाचा अभिमान सुद्धा.
“तुम्ही रोज येता का इथे? मला आवडेल तुमचं गाणं रोज ऐकायला.”
ते नुसतेच हसले आणि तिथून निघाले. मला जरा आश्चर्य वाटलं पण मग मी ही तिथून निघालो.
घड्याळ पाहिलं तर पहाटेचे पाच वाजले होते. सूर्योदयाची चाहूल लागली होती. हळूहळू घराकडे जाताना नाक्यावर चहाची टपरी दिसली. तोही नुकताच धंदा सुरू करत होता. चहा घेण्यासाठी म्हणून थांबलो. तितक्यात तिथे पेपरवाला ही दिसला. चहा सोबत वाचायला म्हणून पेपर घेतला. मनात अजूनही पंडितजींचा आवाज घुमत होता. ही रात्र अद्भुत होती. कायम स्मरणात राहणारी. 
चहाचा घोट घेत मी पेपर चाळत होतो. इतक्यात मधल्या एका पानावर पंडितजींचा फोटो दिसला. आत्ता भेटलेल्या माणसाचा फोटो पेपर मधे पाहून मी आनंदानं वाचायला गेलो तर फोटो खाली लिहिलं होतं:
पंडित रामशंकर ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांची आज पाचवी पुण्यतिथि होती.



- निनाद वाघ



Friday, 13 May 2016

पुस्तक



वाचन तसं माझं फारसं नाही पण आयुष्य नावाचं एक अनोखं पुस्तक जन्मापासून वाचतो आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यावर आधारित ही माझी नवीन कविता:



पुस्तक

उघडून पुस्तक आयुष्याचं
वाचायला घेतलं प्रत्येक पान..
वाचता वाचता जाणवलं
हे पुस्तक तर फारच लहान..

कोरी होती काही पानं
काही मात्र झिजलेली..
नक्षीदार काही पानं
काही आठवणींनी भिजलेली..

वाचताना काही पानं
मन अलगद सुखावले..
काही पानांमुळे मात्र
डोळ्यांचे कड ओलावले..

सरता सरता हे पुस्तक
वाटले फार गंमतीदार..
ह्यात सुखाची पानं कमी
अन् दुःखाचे अध्याय फार..



- निनाद वाघ




Friday, 6 May 2016

बेड नंबर १५



आज आसमंतात सर्वत्र मळभ पसरले होते. भर उन्हाळ्यात आभाळ सुध्दा भरून आलं होतं. मी त्या वास्तू जवळ पोहोचलो. अगदी अस्वस्थ मनाने त्या पायऱ्या चढलो. प्रत्येक पायरी सोबत मनातली धाकधूक वाढत होती. तिसऱ्या माळ्यावर पोहोचलो तेव्हा माझे बिथरलेले डोळे अगदी कासावीस होऊन त्यांना शोधू लागले अन् दिसला तो अगदी कोपऱ्यात असलेला बेड नंबर १५.

त्या बेडवर त्यांना झोपलेल्या अवस्थेत पाहिलं आणि डोळ्याच्या कडा ओलावल्या. जरा जवळ गेलो आणि माझ्या थरथरत्या हातांनी त्यांचा स्थिर हात हातात घेतला आणि कापऱ्या स्वरात हुंदका गिळत म्हटलं, “आजोबा मी आलोय” 

माझा स्पर्श त्यांच्यासाठी ओळखीचा होता. त्यांनी त्यावरून मला ओळखलं कारण मला पाहून ओळखण्याची मुभा त्यांच्याकडे नव्हती. दुर्दैवाने ते अंध होते. 
“काय कसे आहात?” मी विचारलं.

ते बोलायचा प्रयत्न करू लागले. खूप काही सांगायचं होतं त्यांना. आपलं मन मोकळं करायचं होतं पण नियतीनं त्यांना सक्तीचं मौन पाळायला लावलं होतं. त्यांची बोलण्याची ताकद हिरावून घेतली होती.
माझं आणि आजोबांचं असं एक अनोखं नातं होतं. त्यांच्या प्रत्येक हाकेला ओ द्यायला मी हजर असायचो. माझ्या कवितांचे कार्यक्रम आकाशवाणीवर झाले ते त्यांच्याच प्रोत्साहनानं. मी आयुष्यात शिक्षण आणि मानानं फार मोठा झालेलं त्यांना पाहायचं होतं. मी माझ्या कवितांचा कार्यक्रम सादर करावा आणि त्यात अगदी पहिल्या रांगेत बसून त्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा अशी त्यांची इच्छा होती.

अगदी काल परवा पर्यंत हसत खेळत माझ्या सोबत गप्पा मारत बसलेले माझे आजोबा आज असे अंथरूणावर खिळून राहिलेले दिसतात तेव्हा मन कितीही खंबीर असलं तरी ते पार कोलमडून जातं. मनात विचारांना उधाण येतं. तेही खवळतं.

मी त्यांच्या अंगावरून हात फिरवला. ते सांगू शकत नसले तरी त्यांना होणाऱ्या वेदना जाणवत होत्या. आपल्या उजव्या हाता पायाने ते उठून बसण्याचा करत असलेला केविळवाणा प्रयत्न माझे वाहणारे डोळे हताशपणे पाहत होते. डावीकडून त्यांना साथ नव्हती. ती बाजू पूर्णतः निकामी झाली होती. स्वतःच्या मर्जीनं ते आपल्या हाताची बोटं सुध्दा फिरवू शकत नव्हते. इतकं लाचार झालेलं मी त्यांना ह्या आधी कधीच पाहिलं नव्हतं.
त्यांचं जीवन अगदी सरळ साधं होतं. कधीच कुणाचा वाईट विचार केला नाही. अशा माणसाला असं असहाय्य जगणं कशासाठी? 

तेव्हा बा. सी. मर्ढेकर ह्यांच्या कवितेची ओळ आठवली
“जगायची पण सक्ती आहे मरायची पण सक्ती आहे”

आजोबांची ही अवस्था काही पाहवत नव्हती पण तिथून पावलं देखील वळत नव्हती. आजोबांकडे पाहत माझं मन हळवं होत म्हणालं:

आजोबा तुम्हाला भेटल्या शिवाय राहवत नाही
तुमची ही अवस्था डोळ्यांनी काही पाहवत नाही..
वेदनेतून सुटका व्हावी असं मनाला वाटतं
आठवणींनी तुमच्या मन बघा दाटतं..
म्हणून म्हणतो..
जे झालं ते व्हायला नको होतं..
आधीच अंधारात असलेलं जीवन 
अजून काळोखात जायला नको होतं..
जगायला अशी सक्ती तरी कशाला?
मरणाच्या दारावर असं झुरायला नको होतं..

अगदी जड अंतःकरणाने मी तिथून निघालो. पायरी जवळ पोहोचलो तेव्हा आजोबांची हाक ऐकू आली. मी मागे वळलो तर त्या बेड वर ते अगदी दीन अवस्थेत अंधारात दिसणाऱ्या जगाकडे शून्यात पाहत पडले होते. कदाचित त्यांच्या हृदयानी मारलेल्या हाकेला माझ्या मनाने अलगद ओ दिला असावा.



- निनाद वाघ





Friday, 29 April 2016

आयुष्य सुरू राहे


आयुष्य सुरू राहे


जन्म झाला । माणूस आला ।
आनंद झाला । आयुष्य सुरू राहे ।।१।।

लहान ओंजळ । दिवस प्रांजळ ।
स्वप्नांचे मृगजळ । आयुष्य सुरू राहे ।।२।।

तरुण काया । जीवनाचा पाया ।
गेले जरी वाया । आयुष्य सुरू राहे ।।३।।

जगायला पैसा । लागतो जैसा ।
खिशातून नाहीसा । आयुष्य सुरू राहे ।।४।।

चाळीशीचा टप्पा । अनुभवी गप्पा ।
कुणी आई कुणी पप्पा । आयुष्य सुरू राहे ।।५।।

वय वर्ष साठ । आजारांशी गाठ ।
निराधार वाट । आयुष्य सुरु राहे ।।६।।

मंदावते वात । टाकली कात ।
जीवनाचा आघात । आयुष्य सुरु राहे ।।७।।

माणूस मेला । शोक केला ।
काळ गेला । आयुष्य सुरु राहे ।।८।।


- निनाद वाघ



Friday, 22 April 2016

राहून गेलेली गोष्ट



नेहमी प्रमाणे आज देखील मी ८:१६ च्या बस साठी धावलो. गरमीचे दिवस. घामाच्या धारा वाहत होत्या.

“अहो ३७ नंबर गेली का? " मी शेजारच्या माणसाला विचारलं.“नाही अजून”
एखाद्या खेळाडूला मेडल मिळाले की जितका आनंद होतो, त्याहून अधिक आनंद मला, आपली बस चूकली नाही, हे ऐकून झाला.
बस आली. मी त्यात चढलो. आज बसायला जागा मिळाली. माझ्या बाजूला एक आजोबा बसले होते. अगदी साधी वेषभूषा.डोळ्यांवर चष्मा. खांद्यावर कापडी पिशवी आणि हातात काही सुंदर चित्र होती.
मला राहावले नाही म्हणून मी सहज त्यांना म्हटले, “आजोबा ही चित्र कुठून आणली ? अप्रतिम आहेत!”
हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला. मला म्हणाले, " बाळा ही मी स्वतः काढली आहेत."
मला आश्चर्याचा धक्का बसला.
"वाह ! तुम्ही चित्रकार आहात ? "
"नाही रे. हौस म्हणून काढतो."
हे सांगत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक खंत दिसली.
"काय झाले आजोबा ? "

"काही नाही रे! लहानपणापासून आवड होती. जगातील प्रसिद्ध चित्रकार व्हायचे स्वप्नं पाहिले होते. परंतु चित्रकाराचे उत्पन्न फार कमी. घरच्या लोकांना ते पसंत नव्हते. त्यांचा विरोध होता. म्हणून इच्छा नसताना देखील इंजिनियर झालो. चांगली नोकरी मिळाली. पुढे लग्न झाले. संसार सुरू झाला. आयुष्याच्या चित्रात रंग भरताना माझी आवड मात्र मागे राहिली.
पैसे आले. चांगले आयुष्य मिळाले परंतु आनंद नाही मिळाला. आज मुलं परदेशी आहेत. सुखी आहेत. पत्नी चे निधन झाले. आज आयुष्याच्या ह्या टप्प्यावर काय मिळालं ह्या पेक्षा माझं स्वप्न अपूर्ण राहिले ह्या गोष्टीचे दुःख जास्त आहे. मनात खंत उरते रे. तुझे काही स्वप्न आहे का? जर असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, स्वतःचे स्वप्न पूर्ण कर. जे आहे ते ह्या जन्मात. एखादी राहून गेलेली गोष्ट पुढच्या जन्मी करीन हे आपल्या अपयशाचे केलेले समर्थन आहे . लक्षात ठेव! "
त्यांच्या डोळ्यात पाणी होते. चष्म्या मागून येणारा तो अश्रू चा थेंब हृदयाला चटका लावणारा होता.
बस थांबली. ते उतरले . मी थक्क होऊन पाहत राहिलो…


 - निनाद वाघ




Friday, 15 April 2016

शर्यत



शर्यत

आयुष्याच्या शर्यतीत धावताना
जेव्हा अचानक मागे वळून पाहिलं
तेव्हा मी खूप पुढे आलो होतो
पण आयुष्य मागेच राहिलं.

धडपड केली पैश्यांसाठी
न संपणाऱ्या इच्छांसाठी
जगता जगता मरत राहिलो
अन् मरता मरता जगत राहिलो
जेव्हा अफाट पैसा हाती आला
तेव्हा पुन्हा मागे वळून पाहिलं
मी खूप पुढे आलो होतो
पण आयुष्य मागेच राहिलं

स्वतःला सिद्ध करता करता
जगणं काय तेच विसरून गेलो
कृत्रिम स्वप्नं पूर्ण करता करता
स्वतःमधेच हरवून गेलो
स्वप्न पूर्ण होताना
मी पुन्हा मागे वळून पाहिलं
पण मी खूप पुढे आलो होतो
आणि आयुष्य मागेच राहिलं

पैसा संपत्ती गोळा करण्यात
आयुष्य माझे पूर्ण वाहिले
निरोप घेताना जगाचा
हात मात्र रिकामेच राहिले

मिटले डोळे थांबले ठोके
स्तब्ध झाले हृदयाचे झोके
आयुष्य जगण्याचे तेव्हा
समजू लागले धडे
पण देह गेला सोडून
अनंतातल्या देवाकडे
जाता जाता मात्र
जेव्हा शेवटचं मागे वळून पाहिलं
तेव्हा मी खूप पुढे आलो होतो
पण आयुष्य मागेच राहिलं..



- निनाद वाघ



Friday, 8 April 2016

जुनंच आयुष्य नव्यानं जगणं


आज गुढीपाडवा. आपलं नवं वर्ष. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचे व समाधानाचे होवो.
ह्याच शुभ मुहूर्तावर एक नवी सुरूवात करूया असा संकल्प आहे. आपलं जुनंच आयुष्य नव्यानं जगूया असा विचार मांडणारी माझी ही नवी कविता सादर करतोय.


जुनंच आयुष्य नव्यानं जगणं.


जुने रस्ते नव्या वाटा
जुनेच किनारे नव्या लाटा
जुन्या जखमा नवं दुखणं
जुनेच डोळे नवी स्वप्न
जुनी ठेच नव्यानं लागणं
जुनंच आयुष्य नव्यानं जगणं


जुनी वस्तू नवी किंमत
जुनाच खेळ नवी गंमत
जुना झोपाळा नवे झोके
जुनंच घड्याळ नवे ठोके
जुना आशीर्वाद नव्यानं मागणं
जुनंच आयुष्य नव्यानं जगणं


जुनी माणसं नवे छत्र
जुनीच अक्षरं नवी पत्र
जुने पेच नवे प्रसंग
जुन्याच अपेक्षा नवे भंग
जुना स्वभाव नव्यानं वागणं
जुनंच आयुष्य नव्यानं जगणं..



- निनाद वाघ



Friday, 1 April 2016

एक गुपीत आयुष्यचं..


नुकत्याच SSC परिक्षा संपल्या. आता दहावी नंतर पुढं काय ह्या पेचात अनेक मुलं असतात. काही वर्षांपूर्वी हाच प्रश्न मलाही पडला होता. निर्णय घेताना पार गोंधळ उडाला होता. त्या नंतर आयुष्यात असे अनेक क्षण आले. अनेक निर्णय घेतले. काही फसले तर काही अगदी अचूक ठरले. ह्या वरून मी एक गोष्ट शिकलो आणि नेमका हाच विचार मी माझ्या ह्या कवितेत मांडतो आहे. 


एक गुपीत आयुष्यचं..

समोर रस्ते चार होते
मार्ग कुठला निवडू कळेना..
निवडला एक मार्ग शेवटी
पण पावलं तिथे वळेना..

निवडताना तो रस्ता
सल्ले घेतले इतरांचे..
ऐकले नाही तेव्हा
आतून येणाऱ्या स्वरांचे..

प्रवास खडतर वाटू लागला
कायम संकटानी ग्रासलेला..
चहू बाजूने अंधार पसरला
कायम दुःखाने त्रासलेला..

एके दिवशी मग मी
एक दृढ निश्चय केला..
चार पावलं मागे वळत
प्रवास नव्यानं सुरू केला..

आता प्रवास सुकर झाला
जीवनात माझ्या आनंद आला..
दुःख सारे विरुन गेले
आयुष्य नव्याने उदयास आले..

आनंदी आयुष्याचं तुम्हाला गुपीत
सांगतो नीट ऐका जरा..
सल्ला देणारे भेटतील खूप
पण मनाला आवडेल तेच करा..

- निनाद वाघ




Friday, 25 March 2016

अशी झाली फजिती


आज सकाळी एक गमतीदार किस्सा घडला. म्हणजे झालं असं की सकाळी मी काही कामा निमित्तानं बाहेर दुकानात गेलो होतो. मी दिलेल्या सामानाच्या यादीत काही गोष्टी गोदामात होत्या म्हणून दुकानवाल्यानं मला जरा अर्धा तास थांबायला सांगितलं. थांबण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता म्हणून दाराजवळ असलेल्या सोफ्यावर मी बसलो. पेपर चाळायला घेतला. इतक्यात माझ्या शेजारी एक मुलगा येऊन बसला. तोही पेपर वाचत होता. वाचताना तो अचानक म्हणाला “ काय सॉलिड मँच झाली काल..”

क्रिकेट हा माझा आवडता विषय असल्या कारणाने मी ही बोलू लागलो आणि आमच्यात गप्पा सुरू झाल्या. मग गल्लीपासून दिल्ली पर्यंत तर क्रिकेट पासून सिनेमा असे सगळे विषय आमच्या चर्चेत आले. गप्पा सुरू राहिल्या. बोलता बोलता आमच्या संभाषणात मनोहर पालवेंचा उल्लेख झाला.
मनोहर पालवें बद्दल माझं मत काही फार चांगलं नव्हतं. मी भेटलो होतो त्यांना अनेकदा किंबहुना नाइलाज म्हणून भेटावं लागायचं. दादरला त्यांचं अॉफिस होतं. खरं सांगतो फार विक्षिप्त माणूस. सारखी निराशेची भाषा. असा इतका नकारात्मक माणूस मी आजवर पाहिला नव्हता.

मी त्या मुलाला लगेच म्हटलं “अरे तो मनोहर पालवे म्हणजे एक नंबरचा विचित्र माणूस. सारखी कटकट आणि बोलण्यात सारखा नाराजीचा सूर. त्यांचं बोलणं ऐकून एखादा आशावादी माणूस सुद्धा प्रचंड निराशावादी होऊन बसेल. तुझा कधी संबंध आलाच तरी त्यांच्या पासून दूर रहा. सुखात रहाशील”
तो मुलगा मिश्कील हसला. बहुधा त्याला ही माझं म्हणणं पटलं असावं. पालवेंच्या अशा वागण्याचा त्यांनेही प्रत्यय घेतला असावा.

दुकानदाराने मला बोलावले. माझं सामान घेतलं आणि निघताना त्या मुलाला मी म्हटलं, “भेटू पुन्हा कधीतरी ..तुझा नंबर दे”
नंबर घेतला. बाय द वे नाव काय तुझं?
“आकाश मनोहर पालवे”

माझी बोलतीच बंद झाली ना राव. मला अगदी तोंडावर मारल्या सारखं झालं. एक शब्द ही न बोलता मी तिथून पळ काढला. बोलणार तरी काय होतो..ज्यांच्या बद्दल त्या मुलाला सांगत होतो.तक्रार करत होतो. दूर राहण्याचा सल्ला दिला. तो इसम त्याचाच बाप निघाला. माफ करा ते त्याचे पूज्य पिताश्री निघाले.
थेट घर गाठलं. आणि मग मात्र झालेल्या प्रकारावर जाम हसू आलं. स्वतः स्वतःवरच.



- निनाद वाघ




Friday, 18 March 2016

द्वंद्व : स्वतःचं स्वतःशीच..!!


आजच्या कवितेचा जो आशय आहे हा खरंतर प्रत्येकाला लागू होतो. आपण अनेकदा एखाद्या प्रसंगात फसतो आणि तेव्हा निर्णय घेणं कठीण होऊन बसतं. ह्याचं कारण म्हणजे, आपलं मन आपल्याला एक सांगत असतं पण हृदयाला ते पटत नसतं आणि ह्यात आपलं सारं आयुष्य फसतं. निर्णय चुकतात आणि आपण नंतर नुसताच पश्चात्ताप करत बसतो. नेमका हाच विचार मांडणारी माझी ही कविता.


द्वंद्व


द्वंद्व स्वतःचं स्वतःशीच असतं
विचारांचं वैर विचारांशीच असतं
चूक कुणाचीही नसते तरीही
हृदयाचं मनाशी कधीच पटत नसतं


मन आपुले वास्तववादी
हृदय प्रचंड आशावादी
निर्णय घेणं कायम कठीण असतं 
कारण हृदयाचं मनाशी कधीच पटत नसतं


हृदयाला सगळंच चांगलं दिसतं
मनाला मात्र ते चुकीचं वाटतं
ह्यात आपलं अख्ख आयुष्य फसतं
कारण हृदयाचं मनाशी कधीच पटत नसतं


हृदयाला पटकन ठेच लागते
मन तसं घट्ट असतं
कितीही प्रयत्न करा तरी
हृदयाचं मनाशी कधीच पटत नसतं..



- निनाद वाघ




Friday, 11 March 2016

स्त्री जन्मा..तुला सलाम….!!!


             नुकताच ०८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा झाला. ह्याच पार्श्वभूमीवर माझी एक कविता शेयर करतोय. आजही आपल्या समाजात महिलांना दुय्यम स्थान दिलं जातं. एकीकडे ही पुरुषप्रधान मानसिकता आणि दुसरीकडे महिला दिन साजरा करायचा. हे समाजाचं विसंगत वागणं मनाला पटत नाही.
घर संसार आणि नोकरी सांभाळत आयुष्य उत्कृष्ट रित्या जगणाऱ्या ह्या स्त्री समाजाचा खरंच मनापासून आदर वाटतो. ह्यांचा खरा सन्मान तेव्हाच होईल जेव्हा अत्याचार, बलात्कार, स्त्री भ्रृणहत्या सारख्या असंख्य घटना समाजातून नाहीशा होतील आणि एक सुरक्षित वातावरण तयार होईल. हा स्त्री समाजाचा खरा गौरव असेल.

स्त्री जन्मा..तुला सलाम….!!!

शब्दात कसा सांगू 
तू आहेस किती थोर..
स्त्री तुझा जन्म 
खरंच आहे खूप कठोर..

त्याग करतेस तू
आयुष्याच्या प्रत्येक पावली..
तरीही खंभीरपणे असतेस उभी
जणू मायेची सावली..

करतेस संस्कार चांगले 
शिकवतेस चांगली तत्त्व..
प्रसंगी कधी रागवतेस
तरी ऊरी कायम ममत्व..

समाजात जगताना
तू कधीच सुरक्षित नसतेस..
तुझ्या सान्निध्यात मात्र
तुझ्या परिवाराला सुरक्षित ठेवतेस..

येणारा प्रत्येक दिवस
तुझ्यासाठी एक नवं आव्हान असतं..
बाईचा जन्म जगणं
हे काही सोपं काम नसतं..

थकवा तुला ठाव नाही 
काय अफाट तुझ्यात असते ऊर्जा..
पण पुरुष प्रधान समाजात 
तुला मात्र नेहमी दुय्यम दर्जा..

अशा परिस्थितीत जगताना
तुला काळजी सर्वांची..
स्वतःचे दुखणे लपवून 
सुश्रुषा करते इतरांची..

दाखवत नाहीस कधीही 
परी तुझ्या ही अंतरी तरळते पाणी..
सलाम तुझ्या कर्तृत्वाला
स्त्री जन्मा.. थोर तुझी कहाणी..!



- निनाद वाघ



Friday, 4 March 2016

एक नोट नशीबाची



रस्त्यावर चालत असताना अनेकदा आपल्याला तो गरीब मदत मागताना दिसतो. आपण सहज त्याकडे दुर्लक्ष करत पुढं चालत राहतो. काही जण तर मदत करत नाहीत तर त्यांचा अपमान करतात. तो बिचारा निमूटपणे जगत असतो त्याच्या माथी लागलेलं प्रारब्ध, त्याचा काय दोष असतो? मदत नाही केली तरी चालेल निदान अपमान तरी करू नका.

एक नोट नशीबाची..


रस्त्यावरून जाताना, स्वतःच्या धुंदीत चालताना
गाडीमध्ये बसताना, नाक्यावर खाताना..
कापऱ्या स्वरात अचानक एक आवाज येतो:
“ साहेब.. ओ साहेब.. काहीतरी द्या "
आपण क्षणभर थांबतो, मागे वळून बघतो
तेव्हा एक कासावीस मुलगा समोर दिसतो
कळकट मळकट जुनी वस्त्रे
जेमतेम चिंद्या खिसे फाटके
तहानलेला चेहरा अन् पोटातली भूक
जन्म असा मिळणे ह्यात त्याची काय चूक?
त्याची बिकट प्रतिमा आपण डोळ्यांनी पाहतो
तेव्हा नकळत हात आपुला खिश्याकडे जातो..
रूपया देऊ की नोट, असा विचार मनी येतो
ठरवताना आपण, तो रुपया त्याच्या हाती ठेवतो..
पुन्हा खिशात जाते मग, बाहेर निघालेली नोट
रूपयात त्या पोराचे भरेल तरी का हो पोट?
तिच नोट घेऊन मग मंदिराची पायरी चढतो
हात जोडत देवासमोर दुःख आपले सांगतो..
ठेवत ती नोट देवा चरणी जातो त्याला शरण
जर दिली असती तीच नोट त्या पोराला
कदाचित आज टळले असते त्याचे मरण..




- निनाद वाघ



Friday, 26 February 2016

मन हे आपुले



                  नेहमीच मी तुमच्याशी माझ्या मनातलं मांडतो मनातलं बोलतो पण आज मी तुमच्याशी जरा वेगळं बोलणार कारण आज माझ्या मनातलं नाही तर मना विषयी बोलणार आहे. आपल्या नाजूक मनाविषयी. कधी भावूक होणारं मन तर कधी आनंदी मन. कधी हताश झालेलं मन तर कधी उत्साही मन. अनेक आठवणी जपणारं मन. अनेक विचार निर्माण करणारं मन. क्षणात इकडे तर क्षणात तिकडे असं निसर्गात सहजतेनं वावरणारं आपलं मन. ह्या आपल्या मनावर व्यक्त होताना मी माझी ही कविता शेयर करतोय:

मन हे आपुले..

मन हे आपुले मन हे आपुले
जाई कधी कुठे हे ना कळे..

हे मन आपुले चंचल 
नसे त्याला क्षणभर थारा
सोसाट्यानं वाहत राही
जसा निसर्गात हा वारा
स्तब्ध राहते कधीकधी 
तर कधी झपाट्याने पळे
मन हे आपुले मन हे आपुले
जाई कधी कुठे हे ना कळे..

लावूनी पंख स्वतःला
ते आसमंतात उडे 
झाडां सोबत झुलताना
कधी सागरात बुडे
जाई सरळ कधीकधी 
तर कधी अचानक वळे
मन हे आपुले मन हे आपुले
जाई कधी कुठे हे ना कळे..

अशा ह्या मनाला जपणं फार गरजेचं असतं कारण मन नाराज असेल तर आयुष्याचं सारं गणित चुकतं. सर्वत्र नैराश्य पसरतं. कायम मनावर ताण असतो. आपलं स्वास्थ्य बिघडतं आणि मग हळूहळू तो येऊ लागतो.

तो येतो तेव्हा ...

          आयुष्यात हरलो होतो.थकलो होतो.नैराश्य पदरी पडले होते.पार खचून गेलो होतो.अन् अखेर तो आलाच..
अगोदर कधीकधी यायचा मग हळूहळू रोज येऊ लागला आणि आता तर कायमचा मुक्कामाला आला.कायम माझ्या सोबत असायचा. मी लोकांच्या गर्दीत असायचो तरीही तो काही माझी पाठ सोडायचा नाही.मी कामात असायचो तर तो तिथेही असायचा. सगळी कडे तो डोकावू लागला. मग मात्र लोकं ही विचारू लागली पण माझ्याकडे उत्तर नसायचे. तो मला लोकां पासून तोडायचा. त्याच्या मुळे मित्र दुरावले पण त्याचं स्थान मात्र अधिक भक्कम झालं.
         तो जितका नको नकोसा वाटायचा तितकाच तो माझ्या जवळ यायचा.सगळं खूप विलक्षण होतं.
मला वाटायचे की तो फक्त माझ्याच सोबत आहे मग हळूहळू समजत गेलं की तो तर अनेकांसोबत आहे. सगळेच त्याच्या मुळे त्रासलेले.
खरंतर आपलं आयुष्यच असं झालं आहे की तो कोणाच्याही जीवनात डोकावू शकतो.तो सर्वां सोबत वावरत असतो. आपल्या लक्षात येईस तोवर खूप उशीर झालेला असतो.आपण खचून जातो. आपण काही करायचे ठरवले की तो आपल्याला मागे खेचत राहतो. त्याच्यामुळेच नैराश्य येते आणि ते चक्र सुरू होतं. एक भरारी घेऊ पाहणाऱ्या आयुष्याचा अस्त होतो. सगळं त्याच्या मुळेच.
        असा असतो हा प्रत्येकाच्या आयुष्यात कधी टप्प्या टप्प्याने तर कधी कायमचाच येणारा 'एकटेपणा'
हा एकटेपणा जर टाळायचा असेल तर मानसिक स्वास्थ्य जपणं फार महत्त्वाचं. मन प्रसन्न असलं की सगळं काही सुरळीत होतं.

मन करा रे प्रसन्न..!

पुरे झाहले दुःख आता
वेदना कुरवाळू तरी किती..?
नको आसवे डोळ्यांत आता
कशाला उद्याची भीती..?

कशाला चिंता कालची..?
गेला दिवस जुना झाला..
घेऊन आता नवी चेतना
नवा दिवस पुन्हा आला..

हे कटू विचार सारे
मनास आपुल्या करती सुन्न..
झटकून सारी दुःख आता
मन करा रे प्रसन्न..!



- निनाद वाघ





Friday, 19 February 2016

जरा माणसांसारखं वागूया



आज तुमच्या समोर माझी एक कविता सादर करतोय. ह्या कवितेचं शीर्षक आहे “जरा माणसांसारखं वागूया”
ह्या कवितेचा संदर्भ असा आहे की बदलणाऱ्या काळा सोबत माणूस इतका बदलत गेला की तो माणसांशी माणसांसारखं वागणं विसरून गेला.
खरंतर माणूस हा शिक्षण, नोकरी, पैसा ह्यात असा काही गुंतला गेला आहे की त्याच्याकडे नेहमीच वेळेचा अभाव असतो. ना परिवारासाठी तो वेळ देऊ शकतो, ना मित्र मैत्रीणींसाठी आणि ना स्वतःसाठी. शिवाय फेसबूक, वॉट्सॲप सारख्या माध्यमातून जग अगदी जवळ आलंय. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात आपण कुणाशीही बोलू शकतो, त्याला पाहू शकतो पण ह्या सगळ्यात माणसांमधे दुरावा निर्माण होत आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आजकाल आपल्या घरच्या लोकांशी बोलणं तर होतं पण संवाद हरवलाय. तुम्हाला तरी आठवतं का कट्ट्यावर मित्रांशी शेवटच्या गप्पा कधी मारल्या? हे सगळं आता ऑनलाइन होतं. नात्यांमधली ती गंमत हरवलीय.
एखाद्या यंत्रासारखं आपल्या कामाचं चक्र नुसतं सुरू असतं. काहीजण तर आपल्या स्वतःच्या घरी लॉजींग बोर्डींगला आल्या सारखे येतात. रात्री चेक इन करतात अन् सकाळी चेक आऊट.
जगण्यासाठी माणसाला काम करून पैसे कमवणं नक्कीच गरजेचं आहे पण हे करत असताना थोडा वेळ आपल्या माणसांना देणंही तितकंच गरजेचं आहे. आपण कितीही बिझी असलो, कामाचा कितीही लोड असला तरीही थोडा वेळ हे सारं बाजूला सारून माणसांशी मनमोकळेपणाने वागता आलं पाहिजे म्हणजे जगणं नक्कीच सुकर होईल. नाही का?



जरा माणसांसारखं वागूया..

सारून सारं बाजूला
मनमोकळं जगूया म्हणतोय..
तुटलेली नाती सारी
पुन्हा नव्याने जोडूया म्हणतोय
आज जरा माणसांशी
माणसांसारखा वागूया म्हणतोय..


आजी सोबत जरा निवांत
गप्पा मारूया म्हणतोय..
आजोबांसोबत फिरायला जरा
पार्कात जाऊया म्हणतोय..
आज जरा माणसांशी
माणसांसारखा वागूया म्हणतोय..


आईच्या हातचा गरम भात
तिच्या सोबत जेवूया म्हणतोय..
सोडून नुसते बोलणे
बाबांशी संवाद साधूया म्हणतोय..
आज जरा माणसांशी
माणसांसारखा वागूया म्हणतोय..


ताईची गंमत करताना
दादाची ही खोड काढूया म्हणतोय..
सोनेरी बालपण आठवताना
सारं जग विसरूया म्हणतोय..
आज जरा माणसांशी
माणसांसारखा वागूया म्हणतोय..


मित्रांना आता पुन्हा
जुन्याच कट्ट्यावर भेटूया म्हणतोय..
तुटलेली नाती सारी
पुन्हा नव्याने जोडूया म्हणतोय..
आज जरा माणसांशी
माणसांसारखा वागूया म्हणतोय..


- निनाद वाघ



Friday, 12 February 2016

वडा पाव


मी शाळेत असतानाची गोष्ट. आमच्या शाळेच्या आवारात एक माणूस रोज यायचा. वयाने तसा वृद्ध होता. कमरेतून जरासा वाकलेला. डोक्यावर वेताची टोपली अन् त्यात लाल रंगाच्या गोळ्या आणि वडा पाव विकायचा. त्या काळी शाळेत जाताना खिशात मोबाईल किंवा मनगटावर घड्याळ नसायचे आणि म्हणूनच वर्गाच्या खिडकीतून त्या माणसाला आवारात शिरताना पाहिले की समजायचे आता लवकरच मधली सुट्टी होणार अन् आनंद व्हायचा.
मधल्या सुट्टीत मुलांचा घोळका नेहमी त्याच्या अवती भोवती असायचा.सर्व मुलांचा तो लाडका ‘वडा पाव चाचा’ होता.कोणी वडा पाव घ्यायचं तर कोणी छोट्या लाल गोळ्या. ते चिमुकले हात जेव्हा त्या थरथरणाऱ्या हातावर दोन पाच रूपये ठेवायचे तेव्हा सूरकुत्या पडलेल्या त्याच्या चेहऱ्यावर समाधानाची रेष अगदी स्पष्ट दिसायची.
मलाही कधीकधी मोह व्हायचा वडा पाव खाण्याचा परंतु घरातून परवानगी नव्हती. आईनं दिलेला डबा खायचा अशी सक्त ताकीद होती. गुपचूप खायचं म्हटलं तर खिशात पाच रूपये ही नसायचे. मग एके दिवशी आईकडे खूप हट्ट करून परवानगी मिळवली. शाळेत जाताना आईनं हातात पाच रूपये ठेवले अन् सांभाळून घेऊन जा म्हणून सांगितलं. खिशात पाच रूपये ठेवल्यावर खिसा अगदी भरल्या सारखा वाटला.खूप आनंद झाला. 
शाळेत अगदी उत्साहात गेलो. वर्गात काही लक्ष लागेना. माझी नजर शोधत होती ती फक्त आणि फक्त चाचांना. तास संपत होते तसे मन आणखीनच आतूर होत होते पण चाचा काही दिसेना. इतक्यात मधल्या सुट्टीची बेल झाली. अजूनही चाचांचा काही पत्ता नव्हता. कदाचित चाचा अगोदरच आवारात शिरले असतील ही आशा मनात बाळगून मी अक्षरशः पटांगणात धावलो. ते तिथेही नव्हते. आता मात्र मन उदास झाले होते. रागही खूप येत होता. मी तिथेच जोर जोरात रडू लागलो आणि पुन्हा वर्गात जाण्यासाठी निघालो. तेव्हा अचानक चाचांना पटांगणात शिरताना पाहिले. क्षणात डोळ्यांतून आसवे गायब झाली आणि चेहऱ्यावर प्रसन्नता उमटली. लगेच हात खिशात गेला. आईनं दिलेल्या पाच रूपयांत तीन रूपयांचा वडा पाव आणि दोनच्या लाल गोळ्या घेतल्या. वडा पाव खाण्यापेक्षाही तो स्वतः विकत घेतल्याचा आनंद जास्त होता.मन अगदी तृप्त झालं. 
शाळा सोडून आता अनेक वर्ष लोटली पण आजही कधी शाळेच्या परिसरात गेलो तर माझी नजर त्या चाचांना शोधत असते. आज खिशात पाच चे पाचशे झाले.पोटातली भूकही वाढली.अनेकदा अनेक ठिकाणी वडा पाव खाल्ले पण कधीच चाचांच्या हातची सर त्याला नव्हती. शाळेत असताना खाल्लेल्या त्या पहिल्या वडापावाची चव आजही जिभेवर आहे आणि आयुष्यभर राहील.. 



- निनाद वाघ






Friday, 5 February 2016

माणुसकी दुर्मिळ झाली हो !


आज सकाळीच रमेश भाऊंचा फोन आला. फोनवरून एक दुःखद बातमी समजली आणि मन अगदी हळवं झालं. बातमी होती कविता ताईंच्या निधनाची. सगळं कसं अचानक घडलं. काही आजार नव्हता. वयाने सुद्धा तशा लहानच होत्या. जेव्हा निधनाचं कारण समजलं तेव्हा मात्र मनाला झालेली वेदना अधिक तीव्र झाली. आतून पूर्णतः कोसळलो होतो. स्वतःला जेमतेम सावरत मी त्यांच्या घराकडे निघालो.
मी कविता ताईंच्या घरी पोहोचलो तेव्हा तिथलं वातावरण अगदी शोकाकुळ झालं होतं. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळत होते आणि हृदयात वेदना जी प्रकर्षाने त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. कविता ताईंच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी आता आयुष्यभर जाणवेल ह्याची हळहळ इथं उपस्थित प्रत्येकाला वाटत होती कारण इथं आलेला प्रत्येक माणूस हा कविता ताईंचा ऋणी होता. असे ऋण ज्याची परतफेड कधीच होऊ शकत नाही. निदान ह्या जन्मी तरी नाही.
कविता देशपांडे म्हणजेच माझ्या लाडक्या कविता ताई. हे रसायनच मुळी वेगळं होतं. गेली जवळपास २० वर्षे त्या निस्वार्थ मनाने समाजसेवा करत होत्या. कित्येकांना त्यांनी रोजगार मिळवून दिला तर अनेकांच्या विसकटलेल्या संसाराची घडी पुन्हा व्यवस्थित बसविण्यात त्यांनी मदत केली. ज्यांची घरं उध्वस्त झाली त्यांना पुन्हा खंबीरपणे उभे राहण्याचे बळ दिले तेही ह्यांनीच. त्यांना त्यांच्या कामात मदत करायची संधी मला अनेकदा लाभली. त्यांच्या सोबत काम करायची मज्जा काही और होती.
रमेश भाऊ हे त्यांचे अगदी जुने सहकारी. त्यांना ही अश्रू अनावर झाले होते. ते गहीवरले. बोलताना त्यांचा आवाज कापत होता. "ताई गेल्या रे..ताई गेल्या..आपल्याला सोडून..कायमच्या.."
अंगावर काटा आला.माझ्या पायाखालची जमीन सरखली होती तरीही भाऊंना धीर देत मी म्हणालो,"कसं झालं ?"
तेव्हा हुंदका गिळून ते म्हणाले, "ताई काही आश्रमांना मदत करून घरी परत येत होत्या. रस्ता क्रॉस करत असताना सिग्नल तोडून येणाऱ्या एका भरधाव मोटर सायकलीने त्यांना धडक दिली. रक्ताच्या थारोळ्यात ताई पडल्या होत्या. मदतीसाठी हाका मारत होत्या. बघ्यांची गर्दी जमली पण मदतीसाठी एकही हाथ पुढं सरसावला नाही आणि त्यांनी तिथेच आपले प्राण सोडले.." हे सांगताना भाऊ कोसळले. मीही दोन पावलं मागे गेलो. मनात विचार आला की ज्या बाईने आपले संपूर्ण आयुष्य लोकांच्या मदतीसाठी खर्ची केले त्या बाईला असं मरण यावं? एखाद्या बेवारश्या सारखं?
ही घटना म्हणजे माणूसकीला काळीमा. खरंच विचार करायला लावणारी. ह्या घटनेने एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली की समाजात माणसं तर खूप आहेत पण माणूसकी नाही. या गोष्टीची खरंच खंत वाटते.
कविता ताई तर गेल्या पण माझ्या सारख्या अनेकांना हा वारसा पुढे नेण्यासाठी प्रेरित करून.त्या नेहमी म्हणायच्या समाज सुधारणेसाठी प्रयत्न करत राहवा कारण बदल नक्कीच होणार. त्यांचं म्हणणं बरोबर आहे कारण कुठल्याही अपेक्षा न बाळगता केलेल्या कार्यात अपेक्षा भंग होण्याची भीती नसते. असतो तो फक्त उच्च कोटीचा आनंद. आमचं मार्गदर्शन करायला आमच्या कविता ताई आहेतच. त्याही आहेत ह्या अथांग आसमंतात आम्हाला आशीर्वाद द्यायला..


- निनाद वाघ

Friday, 29 January 2016

हरवले आहे !!


अहो आता तुम्हाला म्हणून सांगतो, असं म्हणतात शोधलं की सापडतं पण मी तर अगदी मनापासून प्रयत्न केला त्याला शोधण्याचा तरीही मला काही ते सापडले नाही. खरं सांगायचं तर ते हरवलं आहे हे समजायलाच खूप उशीर झाला. आयुष्याच्या ह्या प्रवासात ओघाने पुढं जात असताना अचानक एके दिवशी ते नसल्याचे जाणवले. मी मागे वळून पाहण्याचा खूप प्रयत्न केला पण ते काही दृष्टिस पडले नाही. वाईट वाटतं!
ही कहाणी आहे माझ्या हरवलेल्या बालपणाची. आयुष्यातलं हे एक सुंदर निरागस असं पर्व. ह्या सुंदर पर्वाच्या सुखद आठवणी मनात कायमच्या घर करून राहिल्या आणि साठवलेल्या ह्या आठवणींना उजाळा देताना डोळ्यांची कड अलगद ओलावते तेव्हा नकळत हिरावून घेतलेल्या त्या बालपणाची उणीव अगदी प्रकर्षाने भासते.

बसुनी एकटाच तटावरी
येते त्याची आठवण..
आता पुन्हा येणे नाही
किती रम्य ते बालपण..

माझ्या ह्या बालपणाला जबाबदारी म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. मनाला हवं तेव्हा हवं तसं वागायचं. अगदी मनमोकळं बोलायचं. वागण्यात किंवा बोलण्यात कुठलाही कृत्रिमपणा नाही. बोले तो एकदम बिंधास्त..!
बालपणी मन सुद्धा अगदी लहान लहान गोष्टीत रमायचं. खेळायचं बागडायचं आणि भरपूर धमाल. थोडं खोडकर थोडं हट्टी. त्याची गंमत वेगळीच होती. पैसा श्रीमंतीची ओढ नव्हती. ना कसली तडजोड ना धावपळ आणि म्हणूनच टेंशन म्हणजे काय हेही माहित नव्हतं. स्वतःचं असं एक वेगळं विश्व होतं.
काळाच्या ओघात आयुष्य पुढे सरकत राहिलं आणि माझं बालपण त्यात निसटून गेलं. जबाबदाऱ्या वाढत गेल्या. आयुष्य एका विशिष्ट चक्रात फिरू लागलं. वागण्या बोलण्यात कृत्रिमपणा आला. आता माझं माझ्या बालपणाशी भेट होणे शक्य नाही कारण मी खूप पुढे आलो आणि ते मात्र तिथेच राहिलं. अगदी कायमचं!


किनारा :

किनाऱ्यावर होतो उभा
ओढ लागली समुद्राची..
पोहताना त्या खवळलेल्या सागरात
जीव अडकला किनाऱ्यापाशी..

किनाऱ्यासंगे बालपण माझे
अथांग आयुष्य समुद्रासारखे..
सुख दुःखाच्या लाटा वाहे
जीव किनाऱ्यात अडकून राहे..


- निनाद वाघ

Friday, 22 January 2016

जरा ‘त्या' बद्दल बोलूया


मान्यवरहो,

सर्वप्रथम मी तुमची क्षमा मागतो कारण गेल्या काही दिवसात मी काही ब्लॉग पोस्ट केलं नाही. बरेच दिवस नवीन पोस्ट नाही म्हटल्यावर मला अनेकांचे मेसेज आले तर काहींनी मला प्रत्यक्ष विचारलं. ह्यावरून माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही माझा ब्लॉग आवर्जून तर वाचता पण पोस्ट नाही म्हटल्यावर तुम्ही ते मिस केलं आणि म्हणूनच मी एका नव्या विषयासह तुमच्या समोर यायचं ठरवलं.

आज जो विषय निवडला आहे तो विषय तसा सोपा आहे पण तरीही न समजणारा. अगदी सरळ साधं वाटणारा पण तरीही एक न सुटणारं कोडं. हो मला जरा ‘त्या’ बद्दल बोलायचं होतं. ‘त्या' बद्दलच!

त्या बद्दल म्हणजे नेमकं कशा बद्दल हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. तर ऐका..मला बोलायचे आहे ते प्रत्येकाला स्वतःचं असं असणाऱ्या त्या रहस्यमय आयुष्याबद्दल. आपल्या आयुष्याबद्दल!



वाटते सहज, अगदी सोपे
दडली ह्यात अनेक रहस्य..
सुख दुःखाचा खेळ हा सारा
ह्याला म्हणतात आपलं आयुष्य..


खरंतर आयुष्य अशा सुंदर शब्दाला स्वतःची अशी व्याख्या नाही. फार फार तर असं म्हणू शकतो की जन्मापासून मृत्यू पर्यंत केलेला प्रवास म्हणजे आयुष्य. एकट्यानं सुरु झालेला प्रवास असतो हा पण टप्प्या टप्प्यानं त्यात माणसं जोडली जातात आणि ह्या प्रवासाला एक वेगळा रंग चडतो. नाही का?

आयुष्य ह्या एका शब्दात अनेक गुपितं दडलेली असतात. तसं बघाल तर खूप काही आहे आयुष्यावर बोलण्यासारखं पण शब्दात मांडण्या इतकं सोपं ही नसतं ते, कारण अनुभवातूनच ते घडत असतं. दुःखातून सावरत सुखाचा मार्ग शोधत ते अगदी सावधपणे तरीही वेगाने पुढे सरकत असतं. प्रत्येकाचं आयुष्य हे खूप वेगळं असतं पण तरीही त्यात खूप साम्य असतं.

मग इतकं साम्य असताना सुध्दा प्रत्येक आयुष्य वेगळं कसं? अनेकांना हार पत्करावी लागते तर जिंकणं काहींना शक्य होतं. खरंच जिंकणं इतकं कठीण असतं का हो?

ह्याचं उत्तर आहे नाही.

आयुष्यात खरंतर जिंकणं फार सोपं असतं. आयुष्य सहज जिंकता येतं पण त्यासाठी माणसांना जिंकता आलं पाहिजे त्यांचं मन जिंकता आलं पाहिजे.आपल्या माणसांना दुरावून मिळवलेलं यश हे खरंतर आपलं अपयश असतं कारण आयुष्याच्या शेवटी किती पैसे कमावले ह्या पेक्षा आपण किती माणसं जोडली ह्यात माणसांची खरी श्रीमंती ठरते. तीच आपली खरी संपत्ती.तेच आपलं खरं यश.


- निनाद वाघ

Sunday, 3 January 2016

शुभारंभ


प्रिय वाचक,

आज तुमच्याशी संवाद साधतो आहे. तसं तर आपलं नातं जुनंच आहे. ह्या अगदोर ही आपण संवाद साधत होतो ते माझ्या फेसबूक पेजच्या माध्यमातून पण नवं वर्षातील आपली ही पहिली भेट आणि नवीन वर्षात काहीतरी नवं घेऊन तुमच्या समोर यायचं होतं म्हणून हा नवीन ब्लॉग सुरू करतोय.

हा ब्लॉग सुरू करताना असंख्य असे विचार मनात आहेत जे मला तुमच्या समोर मांडायचे आहेत. मनातल्या भावना तुमच्या सारख्या हक्काच्या माणसांसमोर व्यक्त करायच्या आहेत. शब्दांची ही गुंफण करत त्याला भावनांची जरी जोड असली तरी ते शब्द अन् त्यातल्या भावना तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी माध्यम लागतं आणि ह्या पेक्षा अधिक सुंदर माध्यम कुठलं असू शकतं?


शब्दांनाही लागतं माध्यम 
व्यक्त होण्यासाठी..
मनातल्या भावना
मुक्त होण्यासाठी..


ब्लॉगची सुरूवात तर झाली आहे. पण काय लिहावं असा प्रश्न होता. मनापासून जे वाटतं ते लिहिणार हे मात्र निश्चित. शब्दांचा हा सारा खेळ शब्दातून मांडणार. नेमकं काय असेल हे आत्ता नाही सांगत कारण माझ्या प्रत्येक पोस्ट मधून ते उलगडत जाईल आणि त्यातच खरी गंमत आहे. एक मात्र नक्की की इथे विषयाची मर्यादा नसेल कारण विचारांना कधीच कुठली मर्यादा नसते.

मान्यवरहो वाचक हा लेखकासाठी मौल्यवान असतो आणि म्हणूनच शब्दात मांडताना फक्त तुमची साथ हवी आणि ती आहेच ह्याची ही मला खात्री आहे. तुम्ही माझ्या पाठीशी भक्कम पणे आहात ह्याचा प्रत्यय मला नेहमी येतो जेव्हा महाराष्ट्राच्या विविध भागातून अनेकांचे मेसेज येतात. खूप छान वाटतं. माझ्या सारख्या एका सामान्य लेखकाला तुम्ही आपलंसं केलं. तुमच्या ह्या प्रेमाने मी खरंच भारावून गेलो आहे. वेळोवेळी मिळालेल्या ह्या प्रोत्साहनाने लिहिण्याचा उत्साह अधिक वाढतो. मनाला समाधान लाभतं.

चला तर मग हा सिलसिला असाच सुरू राहू द्या.

माझ्या हातून जास्तीतजास्त चांगलं आणि दर्जेदार लिखाण व्हावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि तुमची रजा घेतो ते पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटण्यासाठी.


अगदी जाता जाता काही शब्द खास तुमच्यासाठी..


लेखकासाठी वाचक ठरतो
खरा आधारस्तंब..
रसिकहो तुमच्या आशीर्वादाने करतोय 
ह्या ब्लॉगचा शुभारंभ..


धन्यवाद !!

तुमचा लाडका,

निनाद वाघ