नुकताच ०८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा झाला. ह्याच पार्श्वभूमीवर माझी एक कविता शेयर करतोय. आजही आपल्या समाजात महिलांना दुय्यम स्थान दिलं जातं. एकीकडे ही पुरुषप्रधान मानसिकता आणि दुसरीकडे महिला दिन साजरा करायचा. हे समाजाचं विसंगत वागणं मनाला पटत नाही.
घर संसार आणि नोकरी सांभाळत आयुष्य उत्कृष्ट रित्या जगणाऱ्या ह्या स्त्री समाजाचा खरंच मनापासून आदर वाटतो. ह्यांचा खरा सन्मान तेव्हाच होईल जेव्हा अत्याचार, बलात्कार, स्त्री भ्रृणहत्या सारख्या असंख्य घटना समाजातून नाहीशा होतील आणि एक सुरक्षित वातावरण तयार होईल. हा स्त्री समाजाचा खरा गौरव असेल.
स्त्री जन्मा..तुला सलाम….!!!
शब्दात कसा सांगू
तू आहेस किती थोर..
स्त्री तुझा जन्म
खरंच आहे खूप कठोर..
त्याग करतेस तू
आयुष्याच्या प्रत्येक पावली..
तरीही खंभीरपणे असतेस उभी
जणू मायेची सावली..
करतेस संस्कार चांगले
शिकवतेस चांगली तत्त्व..
प्रसंगी कधी रागवतेस
तरी ऊरी कायम ममत्व..
समाजात जगताना
तू कधीच सुरक्षित नसतेस..
तुझ्या सान्निध्यात मात्र
तुझ्या परिवाराला सुरक्षित ठेवतेस..
येणारा प्रत्येक दिवस
तुझ्यासाठी एक नवं आव्हान असतं..
बाईचा जन्म जगणं
हे काही सोपं काम नसतं..
थकवा तुला ठाव नाही
काय अफाट तुझ्यात असते ऊर्जा..
पण पुरुष प्रधान समाजात
तुला मात्र नेहमी दुय्यम दर्जा..
अशा परिस्थितीत जगताना
तुला काळजी सर्वांची..
स्वतःचे दुखणे लपवून
सुश्रुषा करते इतरांची..
दाखवत नाहीस कधीही
परी तुझ्या ही अंतरी तरळते पाणी..
सलाम तुझ्या कर्तृत्वाला
स्त्री जन्मा.. थोर तुझी कहाणी..!
No comments:
Post a Comment