Friday 29 July 2016

चारोळ्या..



मनातील गोष्ट आज मनात राहून गेली..
आठवणींच्या झर्‍या मधून नकळत ती वाहून गेली..
********************************************

मनात विचार अनेक आहेत
पण शब्द काही सुचत नाही..
हातात लेखणी असून देखील
कागदावर काही उतरत नाही..
********************************************

कुणा एकाच्या सुखासाठी
दुःख आपल्याला सोसावं लागतं..
जसं माणसांच्या आनंदासाठी
ढगांनाही रडावं लागतं..
********************************************

कोसळणाऱ्या पावसाकडे
नुसतं पाहत बसावं..
झेलताना तो प्रत्येक थेंब
मनमोकळं हसावं..
********************************************

जेव्हा असते साथ कुणाची
तेव्हा पावसात सुध्दा रंगत असते..
रटाळ वाटतो हाच पाऊस
जेव्हा कुणाचीच आपल्याला संगत नसते..
********************************************

सुख- दुःख

भास होतो सुखाचा
आनंदी राहते मन..
मग आठवण होते दुःखाची
अन् विस्कटतं सारं जीवन..

सुखाच्या शोधात मग
सुरू होते माझी वारी..
पण सुख आले जेव्हा दारी..
तेव्हा कुरवाळत बसलो होतो
माझी दुःख सारी..
********************************************
दृष्टी नाही तर दृष्टिकोन बदला
म्हणजे सुंदर दिसतील सर्व दृश्य..
इतरांना नको तर स्वतःला बदला
मग बघा किती छान वाटेल आयुष्य..
********************************************
आयुष्यात सरणारा प्रत्येक क्षण
मनात घर करून राहतो..
काळांतराने त्याकडे आपण
आठवण म्हणून पाहतो..
********************************************
आपलं नशीब आपल्या हाती
दोष इतरांना देऊ नका..
आपण घडवू तसंच घडेल आयुष्य
रोष इतरांवर काढू नका..
********************************************
हे आयुष्या.. जरा जपून..
किती रे सुसाट पळशील..
सरळ मार्गी जाताना..
तू मात्र अचानक वळशील..
********************************************
शब्द ही मुके होतात
आठवणींमधे भिजताना..
आभाळाकडे पाहत
पाऊस कवेत घेताना..



- निनाद वाघ

www.shabdatmandatomi.blogspot.in



No comments: