नेहमीच मी तुमच्याशी माझ्या मनातलं मांडतो मनातलं बोलतो पण आज मी तुमच्याशी जरा वेगळं बोलणार कारण आज माझ्या मनातलं नाही तर मना विषयी बोलणार आहे. आपल्या नाजूक मनाविषयी. कधी भावूक होणारं मन तर कधी आनंदी मन. कधी हताश झालेलं मन तर कधी उत्साही मन. अनेक आठवणी जपणारं मन. अनेक विचार निर्माण करणारं मन. क्षणात इकडे तर क्षणात तिकडे असं निसर्गात सहजतेनं वावरणारं आपलं मन. ह्या आपल्या मनावर व्यक्त होताना मी माझी ही कविता शेयर करतोय:
मन हे आपुले..
मन हे आपुले मन हे आपुले
जाई कधी कुठे हे ना कळे..
हे मन आपुले चंचल
नसे त्याला क्षणभर थारा
सोसाट्यानं वाहत राही
जसा निसर्गात हा वारा
स्तब्ध राहते कधीकधी
तर कधी झपाट्याने पळे
मन हे आपुले मन हे आपुले
जाई कधी कुठे हे ना कळे..
लावूनी पंख स्वतःला
ते आसमंतात उडे
झाडां सोबत झुलताना
कधी सागरात बुडे
जाई सरळ कधीकधी
तर कधी अचानक वळे
मन हे आपुले मन हे आपुले
जाई कधी कुठे हे ना कळे..
अशा ह्या मनाला जपणं फार गरजेचं असतं कारण मन नाराज असेल तर आयुष्याचं सारं गणित चुकतं. सर्वत्र नैराश्य पसरतं. कायम मनावर ताण असतो. आपलं स्वास्थ्य बिघडतं आणि मग हळूहळू तो येऊ लागतो.
तो येतो तेव्हा ...
आयुष्यात हरलो होतो.थकलो होतो.नैराश्य पदरी पडले होते.पार खचून गेलो होतो.अन् अखेर तो आलाच..
अगोदर कधीकधी यायचा मग हळूहळू रोज येऊ लागला आणि आता तर कायमचा मुक्कामाला आला.कायम माझ्या सोबत असायचा. मी लोकांच्या गर्दीत असायचो तरीही तो काही माझी पाठ सोडायचा नाही.मी कामात असायचो तर तो तिथेही असायचा. सगळी कडे तो डोकावू लागला. मग मात्र लोकं ही विचारू लागली पण माझ्याकडे उत्तर नसायचे. तो मला लोकां पासून तोडायचा. त्याच्या मुळे मित्र दुरावले पण त्याचं स्थान मात्र अधिक भक्कम झालं.
तो जितका नको नकोसा वाटायचा तितकाच तो माझ्या जवळ यायचा.सगळं खूप विलक्षण होतं.
मला वाटायचे की तो फक्त माझ्याच सोबत आहे मग हळूहळू समजत गेलं की तो तर अनेकांसोबत आहे. सगळेच त्याच्या मुळे त्रासलेले.
खरंतर आपलं आयुष्यच असं झालं आहे की तो कोणाच्याही जीवनात डोकावू शकतो.तो सर्वां सोबत वावरत असतो. आपल्या लक्षात येईस तोवर खूप उशीर झालेला असतो.आपण खचून जातो. आपण काही करायचे ठरवले की तो आपल्याला मागे खेचत राहतो. त्याच्यामुळेच नैराश्य येते आणि ते चक्र सुरू होतं. एक भरारी घेऊ पाहणाऱ्या आयुष्याचा अस्त होतो. सगळं त्याच्या मुळेच.
असा असतो हा प्रत्येकाच्या आयुष्यात कधी टप्प्या टप्प्याने तर कधी कायमचाच येणारा 'एकटेपणा'
हा एकटेपणा जर टाळायचा असेल तर मानसिक स्वास्थ्य जपणं फार महत्त्वाचं. मन प्रसन्न असलं की सगळं काही सुरळीत होतं.
मन करा रे प्रसन्न..!
पुरे झाहले दुःख आता
वेदना कुरवाळू तरी किती..?
नको आसवे डोळ्यांत आता
कशाला उद्याची भीती..?
कशाला चिंता कालची..?
गेला दिवस जुना झाला..
घेऊन आता नवी चेतना
नवा दिवस पुन्हा आला..
हे कटू विचार सारे
मनास आपुल्या करती सुन्न..
झटकून सारी दुःख आता
मन करा रे प्रसन्न..!