Friday 27 May 2016

भावपूर्ण श्रद्धांजली



गेले दोन महिने हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारावर झुरत असलेल्या माझ्या आजोबांचा ८३ वर्षांचा जीवन प्रवास काल अखेर संपला. ते अनंतात विलीन झाले. त्यांची ही साथ सुटली ह्याचं अपार दुःख मनात होतं पण त्याहूनही त्यांची वेदनेतून सुटका झाली ह्याचं काय ते समाधान. ह्या दोन महिन्यात त्यांना खूपच सोसावं लागलं. त्यांना काही सहज मरण नशिबी नव्हतं.
माझं आणि माझ्या आजोबांचं असं एक छान सुंदर नातं होतं. आमचं असं एक वेगळं विश्व होतं. ह्या विश्वात होते ते दोन पक्के मित्र. आमचं हे मैत्रीचं नातं काळा सोबत अधिक बहरत गेलं. अधिक घट्ट होत गेलं. आम्हा दोघांना क्रिकेटचं फार वेड. प्रत्येक सामना आम्ही तहान भूक हरपून फॉलो करायचो. त्या नंतर आमचं चर्चा सत्र चालायचं तासंतास. कोण कसं खेळलं ह्यावर. ते कॉलेजात क्रिकेट टीम मधे होते. तेव्हाचे रंगतदार किस्से त्यांच्या मुखातनं ऐकायला तर फार मज्जा यायची.
त्यांचं बरंच आयुष्य गिरगावच्या चाळीत गेलं. त्यांचं बालपण शाळा सर्व गिरगावात. त्या मुळं माहिमला राहायला लागले तरीही त्या गिरगावच्या आठवणींमधे ते रमायचे. आम्हाला सांगायचे. मग आम्ही सुध्दा अगदी तिथेच आहोत असं वाटायचं. त्यांच्या नजरेतनं मी चाळीतलं जीवन कसं असेल ह्याचा अनुभव अनेकदा घेतला.
आमच्या विश्वात आता मात्र सर्वत्र अंधार पसरला आहे. कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.आता आठवणींच्या हिंडोळ्यावर झुलताना आठवणार ते सोबत घालवलेले ते मौल्यवान क्षण, त्यांच्या सोबत कायम असणारा त्यांचा रेडिओ, त्यांची आवडती बिर्याणी आणि असं बरंच काही. ते आम्हाला जरी सोडून गेले असले तरी त्यांचं माझ्या हृदयातलं स्थान कधीच कमी होणार नाही किंबहुना ते अधिक भक्कम होईल.


आज मला पाडगावकरांच्या कवितेतल्या ओळी आठवतात:

आजोबांच्या खोलीत आता धुकं धुकं धुकं..
आजोबांचं जग आता मुकं मुकं मुकं..



- निनाद वाघ



No comments: