Sunday 3 January 2016

शुभारंभ


प्रिय वाचक,

आज तुमच्याशी संवाद साधतो आहे. तसं तर आपलं नातं जुनंच आहे. ह्या अगदोर ही आपण संवाद साधत होतो ते माझ्या फेसबूक पेजच्या माध्यमातून पण नवं वर्षातील आपली ही पहिली भेट आणि नवीन वर्षात काहीतरी नवं घेऊन तुमच्या समोर यायचं होतं म्हणून हा नवीन ब्लॉग सुरू करतोय.

हा ब्लॉग सुरू करताना असंख्य असे विचार मनात आहेत जे मला तुमच्या समोर मांडायचे आहेत. मनातल्या भावना तुमच्या सारख्या हक्काच्या माणसांसमोर व्यक्त करायच्या आहेत. शब्दांची ही गुंफण करत त्याला भावनांची जरी जोड असली तरी ते शब्द अन् त्यातल्या भावना तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी माध्यम लागतं आणि ह्या पेक्षा अधिक सुंदर माध्यम कुठलं असू शकतं?


शब्दांनाही लागतं माध्यम 
व्यक्त होण्यासाठी..
मनातल्या भावना
मुक्त होण्यासाठी..


ब्लॉगची सुरूवात तर झाली आहे. पण काय लिहावं असा प्रश्न होता. मनापासून जे वाटतं ते लिहिणार हे मात्र निश्चित. शब्दांचा हा सारा खेळ शब्दातून मांडणार. नेमकं काय असेल हे आत्ता नाही सांगत कारण माझ्या प्रत्येक पोस्ट मधून ते उलगडत जाईल आणि त्यातच खरी गंमत आहे. एक मात्र नक्की की इथे विषयाची मर्यादा नसेल कारण विचारांना कधीच कुठली मर्यादा नसते.

मान्यवरहो वाचक हा लेखकासाठी मौल्यवान असतो आणि म्हणूनच शब्दात मांडताना फक्त तुमची साथ हवी आणि ती आहेच ह्याची ही मला खात्री आहे. तुम्ही माझ्या पाठीशी भक्कम पणे आहात ह्याचा प्रत्यय मला नेहमी येतो जेव्हा महाराष्ट्राच्या विविध भागातून अनेकांचे मेसेज येतात. खूप छान वाटतं. माझ्या सारख्या एका सामान्य लेखकाला तुम्ही आपलंसं केलं. तुमच्या ह्या प्रेमाने मी खरंच भारावून गेलो आहे. वेळोवेळी मिळालेल्या ह्या प्रोत्साहनाने लिहिण्याचा उत्साह अधिक वाढतो. मनाला समाधान लाभतं.

चला तर मग हा सिलसिला असाच सुरू राहू द्या.

माझ्या हातून जास्तीतजास्त चांगलं आणि दर्जेदार लिखाण व्हावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि तुमची रजा घेतो ते पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटण्यासाठी.


अगदी जाता जाता काही शब्द खास तुमच्यासाठी..


लेखकासाठी वाचक ठरतो
खरा आधारस्तंब..
रसिकहो तुमच्या आशीर्वादाने करतोय 
ह्या ब्लॉगचा शुभारंभ..


धन्यवाद !!

तुमचा लाडका,

निनाद वाघ