Friday 29 January 2016

हरवले आहे !!


अहो आता तुम्हाला म्हणून सांगतो, असं म्हणतात शोधलं की सापडतं पण मी तर अगदी मनापासून प्रयत्न केला त्याला शोधण्याचा तरीही मला काही ते सापडले नाही. खरं सांगायचं तर ते हरवलं आहे हे समजायलाच खूप उशीर झाला. आयुष्याच्या ह्या प्रवासात ओघाने पुढं जात असताना अचानक एके दिवशी ते नसल्याचे जाणवले. मी मागे वळून पाहण्याचा खूप प्रयत्न केला पण ते काही दृष्टिस पडले नाही. वाईट वाटतं!
ही कहाणी आहे माझ्या हरवलेल्या बालपणाची. आयुष्यातलं हे एक सुंदर निरागस असं पर्व. ह्या सुंदर पर्वाच्या सुखद आठवणी मनात कायमच्या घर करून राहिल्या आणि साठवलेल्या ह्या आठवणींना उजाळा देताना डोळ्यांची कड अलगद ओलावते तेव्हा नकळत हिरावून घेतलेल्या त्या बालपणाची उणीव अगदी प्रकर्षाने भासते.

बसुनी एकटाच तटावरी
येते त्याची आठवण..
आता पुन्हा येणे नाही
किती रम्य ते बालपण..

माझ्या ह्या बालपणाला जबाबदारी म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. मनाला हवं तेव्हा हवं तसं वागायचं. अगदी मनमोकळं बोलायचं. वागण्यात किंवा बोलण्यात कुठलाही कृत्रिमपणा नाही. बोले तो एकदम बिंधास्त..!
बालपणी मन सुद्धा अगदी लहान लहान गोष्टीत रमायचं. खेळायचं बागडायचं आणि भरपूर धमाल. थोडं खोडकर थोडं हट्टी. त्याची गंमत वेगळीच होती. पैसा श्रीमंतीची ओढ नव्हती. ना कसली तडजोड ना धावपळ आणि म्हणूनच टेंशन म्हणजे काय हेही माहित नव्हतं. स्वतःचं असं एक वेगळं विश्व होतं.
काळाच्या ओघात आयुष्य पुढे सरकत राहिलं आणि माझं बालपण त्यात निसटून गेलं. जबाबदाऱ्या वाढत गेल्या. आयुष्य एका विशिष्ट चक्रात फिरू लागलं. वागण्या बोलण्यात कृत्रिमपणा आला. आता माझं माझ्या बालपणाशी भेट होणे शक्य नाही कारण मी खूप पुढे आलो आणि ते मात्र तिथेच राहिलं. अगदी कायमचं!


किनारा :

किनाऱ्यावर होतो उभा
ओढ लागली समुद्राची..
पोहताना त्या खवळलेल्या सागरात
जीव अडकला किनाऱ्यापाशी..

किनाऱ्यासंगे बालपण माझे
अथांग आयुष्य समुद्रासारखे..
सुख दुःखाच्या लाटा वाहे
जीव किनाऱ्यात अडकून राहे..


- निनाद वाघ

4 comments:

Unknown said...

Khup Chan

Unknown said...

खूप छान लिहितोस रे

Unknown said...

Wah mastach

Swati Wagh said...

अप्रतिम कविता