Friday 22 January 2016

जरा ‘त्या' बद्दल बोलूया


मान्यवरहो,

सर्वप्रथम मी तुमची क्षमा मागतो कारण गेल्या काही दिवसात मी काही ब्लॉग पोस्ट केलं नाही. बरेच दिवस नवीन पोस्ट नाही म्हटल्यावर मला अनेकांचे मेसेज आले तर काहींनी मला प्रत्यक्ष विचारलं. ह्यावरून माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही माझा ब्लॉग आवर्जून तर वाचता पण पोस्ट नाही म्हटल्यावर तुम्ही ते मिस केलं आणि म्हणूनच मी एका नव्या विषयासह तुमच्या समोर यायचं ठरवलं.

आज जो विषय निवडला आहे तो विषय तसा सोपा आहे पण तरीही न समजणारा. अगदी सरळ साधं वाटणारा पण तरीही एक न सुटणारं कोडं. हो मला जरा ‘त्या’ बद्दल बोलायचं होतं. ‘त्या' बद्दलच!

त्या बद्दल म्हणजे नेमकं कशा बद्दल हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. तर ऐका..मला बोलायचे आहे ते प्रत्येकाला स्वतःचं असं असणाऱ्या त्या रहस्यमय आयुष्याबद्दल. आपल्या आयुष्याबद्दल!



वाटते सहज, अगदी सोपे
दडली ह्यात अनेक रहस्य..
सुख दुःखाचा खेळ हा सारा
ह्याला म्हणतात आपलं आयुष्य..


खरंतर आयुष्य अशा सुंदर शब्दाला स्वतःची अशी व्याख्या नाही. फार फार तर असं म्हणू शकतो की जन्मापासून मृत्यू पर्यंत केलेला प्रवास म्हणजे आयुष्य. एकट्यानं सुरु झालेला प्रवास असतो हा पण टप्प्या टप्प्यानं त्यात माणसं जोडली जातात आणि ह्या प्रवासाला एक वेगळा रंग चडतो. नाही का?

आयुष्य ह्या एका शब्दात अनेक गुपितं दडलेली असतात. तसं बघाल तर खूप काही आहे आयुष्यावर बोलण्यासारखं पण शब्दात मांडण्या इतकं सोपं ही नसतं ते, कारण अनुभवातूनच ते घडत असतं. दुःखातून सावरत सुखाचा मार्ग शोधत ते अगदी सावधपणे तरीही वेगाने पुढे सरकत असतं. प्रत्येकाचं आयुष्य हे खूप वेगळं असतं पण तरीही त्यात खूप साम्य असतं.

मग इतकं साम्य असताना सुध्दा प्रत्येक आयुष्य वेगळं कसं? अनेकांना हार पत्करावी लागते तर जिंकणं काहींना शक्य होतं. खरंच जिंकणं इतकं कठीण असतं का हो?

ह्याचं उत्तर आहे नाही.

आयुष्यात खरंतर जिंकणं फार सोपं असतं. आयुष्य सहज जिंकता येतं पण त्यासाठी माणसांना जिंकता आलं पाहिजे त्यांचं मन जिंकता आलं पाहिजे.आपल्या माणसांना दुरावून मिळवलेलं यश हे खरंतर आपलं अपयश असतं कारण आयुष्याच्या शेवटी किती पैसे कमावले ह्या पेक्षा आपण किती माणसं जोडली ह्यात माणसांची खरी श्रीमंती ठरते. तीच आपली खरी संपत्ती.तेच आपलं खरं यश.


- निनाद वाघ

No comments: