रोज सायंकाळी साडेपाच वाजता मी शिवाजी पार्कच्या उद्यान गणेश मंदिरात जात असे. आजही गेलो. गणपती बाप्पांचे दर्शन घेतले अन् मंदिरा समोरच्या कट्ट्यावर जाऊन बसलो. आज जोशी काका मात्र कुठं दिसत नव्हते. तसं सहसा त्यांना कधीही उशीर व्हायचा नाही पण आज नेमका झाला.मी त्यांना जरी रोज भेटत असलो तरी आजचा दिवस मात्र खास होता आणि म्हणूनच मी त्यांच्या येण्याची वाट पाहत बसून राहिलो.
माझी जोशी काकांशी ओळख झाली ती साधारणतः पाच वर्षांपूर्वी इथंच ह्याच कट्ट्यावर.जोशी काका म्हणजे एक सामान्य दिसणारे असामान्य व्यक्तिमत्त्व. अगदी साधारण राहणीमान परंतु विचारांची श्रीमंती असणारा माणूस.सदा हसतमुख.
ओळख वाढली तशी आमच्यात मैत्री झाली.आमच्यात जवळजवळ चार दशकांचा फरक होता पण मैत्रीला वयाची मर्यादा कधीच नसते हेच खरं!
काळा सोबत आमची मैत्री अधिक घट्ट होत गेली. मी त्यांच्या कडून खूप काही शिकलो.आयुष्य हसत खेळत कसं जगावं हे त्यांनी मला शिकवलं. कितीही कठीण प्रसंग आला किंवा कसली समस्या असो, त्याला ते अगदी हसत हसत सामोरे जायचे आणि त्यावर मात करायचे. कुठल्याही गोष्टीचा ताण न घेता ही आयुष्य अगदी सुंदर आणि यशस्वीपणे जगता येतं हे त्यांनीच मला दाखवून दिलं. टेंशन घेऊन प्रश्न सुटत नाहीत तर ते अधिक गुंतले जातात अशा मताचे ते होते.
त्यांना मनं जिंकणं अगदी सहज जमायचे.म्हणजे समोरच्या व्यक्तीला न दुखावता ही आपलं म्हणणं त्या पर्यंत सहज पोहोचवायचे. आणि म्हणूनच की काय त्यांचे शत्रू कोणीच नव्हते. जे होते ते फक्त मित्र.
मला ते प्रेमाने बंड्या म्हणून हाक मारायचे.आम्ही रोज कट्ट्यावर बसून गप्पा मारायचो.
आज फ्रेंडशिप डे होता म्हणजेच मैत्री दिन. त्यांच्या साठी मी एक खास भेटवस्तु आणली होती. आपल्याला आयुष्यात मित्र अनेक भेटतात पण खरा मित्र सापडायला भाग्य लागतं. मला ते भाग्य लाभलं म्हणूनच तर जोशी काका सारखे मित्र भेटले. मला माझ्या सुख दुःखात साथ देणारे. योग्य मार्ग दाखवणारे सोबती. खरंच ते एक गोड नातं होतं.एक गोड मैत्री.
त्यांची वाट पाहताना तास कसा उलटला समजलंच नाही.पण त्यांचा मात्र अजूनही काहीच पत्ता नव्हता. आज बहुधा त्यांना न भेटता जावं लागणार होतं.फार उशीर झाला होता. मी घरी जायला निघालो. चार पावलं चाललो इतक्यात काही लोकांची गर्दी दिसली. कुणाची तरी अंतयात्रा निघाली होती. अशा प्रसंगी माझं मन नेहमी हळवं होतं पण माणूस जन्माला येतो तो एक ना एक दिवस मरण पावणार हे निश्चित असतं म्हणूनच त्याला निरोप डोळ्यात अश्रू आणून नव्हे तर हसत हसत द्यावा हेही मला जोशी काकांनीच शिकवलं.
मी हळुहळु चालत राहिलो.चालता चालता सहज नजर पडली ती घेऊन जात असलेल्या प्रेतावर. पाहिलं आणि पायाखालची जमीन सरखली.मृत पावलेली व्यक्ती जोशी काका होती.माझ्या काळजाचा ठोका चुकला.काहीच सुचेना.कट्ट्यावर वाट पाहताना त्यांनी भेटावं अशी इच्छा होती पण ती भेट अखेरची असेल हे माहिती नव्हतं.कायम हसतमुख असणारे जोशी काका आपल्या मृत्यू शैय्येवर सुद्धा हसत झोपले होते. बहुधा मृत्यूला ही ते हसता हसता सामोरे गेले असावेत.
मनात भावना दाटल्या होत्या. देवाने इतकं क्रूर तरी का वागावं? आभाळाला ही भरून आलं अन् तेही कोसळू लागलं.मी आणलेली भेटवस्तु त्यांच्या पायाशी ठेवली आणि वळलो तेव्हा मागून आवाज आला, “थँक्स बंड्या” अन् माझी पावलं नकळत त्यांच्या अंतयात्रेत सामील झाली.
- निनाद वाघ
3 comments:
👌👌
🙄 Touching 😔
Very touching
Post a Comment