Friday 25 March 2016

अशी झाली फजिती


आज सकाळी एक गमतीदार किस्सा घडला. म्हणजे झालं असं की सकाळी मी काही कामा निमित्तानं बाहेर दुकानात गेलो होतो. मी दिलेल्या सामानाच्या यादीत काही गोष्टी गोदामात होत्या म्हणून दुकानवाल्यानं मला जरा अर्धा तास थांबायला सांगितलं. थांबण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता म्हणून दाराजवळ असलेल्या सोफ्यावर मी बसलो. पेपर चाळायला घेतला. इतक्यात माझ्या शेजारी एक मुलगा येऊन बसला. तोही पेपर वाचत होता. वाचताना तो अचानक म्हणाला “ काय सॉलिड मँच झाली काल..”

क्रिकेट हा माझा आवडता विषय असल्या कारणाने मी ही बोलू लागलो आणि आमच्यात गप्पा सुरू झाल्या. मग गल्लीपासून दिल्ली पर्यंत तर क्रिकेट पासून सिनेमा असे सगळे विषय आमच्या चर्चेत आले. गप्पा सुरू राहिल्या. बोलता बोलता आमच्या संभाषणात मनोहर पालवेंचा उल्लेख झाला.
मनोहर पालवें बद्दल माझं मत काही फार चांगलं नव्हतं. मी भेटलो होतो त्यांना अनेकदा किंबहुना नाइलाज म्हणून भेटावं लागायचं. दादरला त्यांचं अॉफिस होतं. खरं सांगतो फार विक्षिप्त माणूस. सारखी निराशेची भाषा. असा इतका नकारात्मक माणूस मी आजवर पाहिला नव्हता.

मी त्या मुलाला लगेच म्हटलं “अरे तो मनोहर पालवे म्हणजे एक नंबरचा विचित्र माणूस. सारखी कटकट आणि बोलण्यात सारखा नाराजीचा सूर. त्यांचं बोलणं ऐकून एखादा आशावादी माणूस सुद्धा प्रचंड निराशावादी होऊन बसेल. तुझा कधी संबंध आलाच तरी त्यांच्या पासून दूर रहा. सुखात रहाशील”
तो मुलगा मिश्कील हसला. बहुधा त्याला ही माझं म्हणणं पटलं असावं. पालवेंच्या अशा वागण्याचा त्यांनेही प्रत्यय घेतला असावा.

दुकानदाराने मला बोलावले. माझं सामान घेतलं आणि निघताना त्या मुलाला मी म्हटलं, “भेटू पुन्हा कधीतरी ..तुझा नंबर दे”
नंबर घेतला. बाय द वे नाव काय तुझं?
“आकाश मनोहर पालवे”

माझी बोलतीच बंद झाली ना राव. मला अगदी तोंडावर मारल्या सारखं झालं. एक शब्द ही न बोलता मी तिथून पळ काढला. बोलणार तरी काय होतो..ज्यांच्या बद्दल त्या मुलाला सांगत होतो.तक्रार करत होतो. दूर राहण्याचा सल्ला दिला. तो इसम त्याचाच बाप निघाला. माफ करा ते त्याचे पूज्य पिताश्री निघाले.
थेट घर गाठलं. आणि मग मात्र झालेल्या प्रकारावर जाम हसू आलं. स्वतः स्वतःवरच.



- निनाद वाघ




Friday 18 March 2016

द्वंद्व : स्वतःचं स्वतःशीच..!!


आजच्या कवितेचा जो आशय आहे हा खरंतर प्रत्येकाला लागू होतो. आपण अनेकदा एखाद्या प्रसंगात फसतो आणि तेव्हा निर्णय घेणं कठीण होऊन बसतं. ह्याचं कारण म्हणजे, आपलं मन आपल्याला एक सांगत असतं पण हृदयाला ते पटत नसतं आणि ह्यात आपलं सारं आयुष्य फसतं. निर्णय चुकतात आणि आपण नंतर नुसताच पश्चात्ताप करत बसतो. नेमका हाच विचार मांडणारी माझी ही कविता.


द्वंद्व


द्वंद्व स्वतःचं स्वतःशीच असतं
विचारांचं वैर विचारांशीच असतं
चूक कुणाचीही नसते तरीही
हृदयाचं मनाशी कधीच पटत नसतं


मन आपुले वास्तववादी
हृदय प्रचंड आशावादी
निर्णय घेणं कायम कठीण असतं 
कारण हृदयाचं मनाशी कधीच पटत नसतं


हृदयाला सगळंच चांगलं दिसतं
मनाला मात्र ते चुकीचं वाटतं
ह्यात आपलं अख्ख आयुष्य फसतं
कारण हृदयाचं मनाशी कधीच पटत नसतं


हृदयाला पटकन ठेच लागते
मन तसं घट्ट असतं
कितीही प्रयत्न करा तरी
हृदयाचं मनाशी कधीच पटत नसतं..



- निनाद वाघ




Friday 11 March 2016

स्त्री जन्मा..तुला सलाम….!!!


             नुकताच ०८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा झाला. ह्याच पार्श्वभूमीवर माझी एक कविता शेयर करतोय. आजही आपल्या समाजात महिलांना दुय्यम स्थान दिलं जातं. एकीकडे ही पुरुषप्रधान मानसिकता आणि दुसरीकडे महिला दिन साजरा करायचा. हे समाजाचं विसंगत वागणं मनाला पटत नाही.
घर संसार आणि नोकरी सांभाळत आयुष्य उत्कृष्ट रित्या जगणाऱ्या ह्या स्त्री समाजाचा खरंच मनापासून आदर वाटतो. ह्यांचा खरा सन्मान तेव्हाच होईल जेव्हा अत्याचार, बलात्कार, स्त्री भ्रृणहत्या सारख्या असंख्य घटना समाजातून नाहीशा होतील आणि एक सुरक्षित वातावरण तयार होईल. हा स्त्री समाजाचा खरा गौरव असेल.

स्त्री जन्मा..तुला सलाम….!!!

शब्दात कसा सांगू 
तू आहेस किती थोर..
स्त्री तुझा जन्म 
खरंच आहे खूप कठोर..

त्याग करतेस तू
आयुष्याच्या प्रत्येक पावली..
तरीही खंभीरपणे असतेस उभी
जणू मायेची सावली..

करतेस संस्कार चांगले 
शिकवतेस चांगली तत्त्व..
प्रसंगी कधी रागवतेस
तरी ऊरी कायम ममत्व..

समाजात जगताना
तू कधीच सुरक्षित नसतेस..
तुझ्या सान्निध्यात मात्र
तुझ्या परिवाराला सुरक्षित ठेवतेस..

येणारा प्रत्येक दिवस
तुझ्यासाठी एक नवं आव्हान असतं..
बाईचा जन्म जगणं
हे काही सोपं काम नसतं..

थकवा तुला ठाव नाही 
काय अफाट तुझ्यात असते ऊर्जा..
पण पुरुष प्रधान समाजात 
तुला मात्र नेहमी दुय्यम दर्जा..

अशा परिस्थितीत जगताना
तुला काळजी सर्वांची..
स्वतःचे दुखणे लपवून 
सुश्रुषा करते इतरांची..

दाखवत नाहीस कधीही 
परी तुझ्या ही अंतरी तरळते पाणी..
सलाम तुझ्या कर्तृत्वाला
स्त्री जन्मा.. थोर तुझी कहाणी..!



- निनाद वाघ



Friday 4 March 2016

एक नोट नशीबाची



रस्त्यावर चालत असताना अनेकदा आपल्याला तो गरीब मदत मागताना दिसतो. आपण सहज त्याकडे दुर्लक्ष करत पुढं चालत राहतो. काही जण तर मदत करत नाहीत तर त्यांचा अपमान करतात. तो बिचारा निमूटपणे जगत असतो त्याच्या माथी लागलेलं प्रारब्ध, त्याचा काय दोष असतो? मदत नाही केली तरी चालेल निदान अपमान तरी करू नका.

एक नोट नशीबाची..


रस्त्यावरून जाताना, स्वतःच्या धुंदीत चालताना
गाडीमध्ये बसताना, नाक्यावर खाताना..
कापऱ्या स्वरात अचानक एक आवाज येतो:
“ साहेब.. ओ साहेब.. काहीतरी द्या "
आपण क्षणभर थांबतो, मागे वळून बघतो
तेव्हा एक कासावीस मुलगा समोर दिसतो
कळकट मळकट जुनी वस्त्रे
जेमतेम चिंद्या खिसे फाटके
तहानलेला चेहरा अन् पोटातली भूक
जन्म असा मिळणे ह्यात त्याची काय चूक?
त्याची बिकट प्रतिमा आपण डोळ्यांनी पाहतो
तेव्हा नकळत हात आपुला खिश्याकडे जातो..
रूपया देऊ की नोट, असा विचार मनी येतो
ठरवताना आपण, तो रुपया त्याच्या हाती ठेवतो..
पुन्हा खिशात जाते मग, बाहेर निघालेली नोट
रूपयात त्या पोराचे भरेल तरी का हो पोट?
तिच नोट घेऊन मग मंदिराची पायरी चढतो
हात जोडत देवासमोर दुःख आपले सांगतो..
ठेवत ती नोट देवा चरणी जातो त्याला शरण
जर दिली असती तीच नोट त्या पोराला
कदाचित आज टळले असते त्याचे मरण..




- निनाद वाघ