Friday 5 February 2016

माणुसकी दुर्मिळ झाली हो !


आज सकाळीच रमेश भाऊंचा फोन आला. फोनवरून एक दुःखद बातमी समजली आणि मन अगदी हळवं झालं. बातमी होती कविता ताईंच्या निधनाची. सगळं कसं अचानक घडलं. काही आजार नव्हता. वयाने सुद्धा तशा लहानच होत्या. जेव्हा निधनाचं कारण समजलं तेव्हा मात्र मनाला झालेली वेदना अधिक तीव्र झाली. आतून पूर्णतः कोसळलो होतो. स्वतःला जेमतेम सावरत मी त्यांच्या घराकडे निघालो.
मी कविता ताईंच्या घरी पोहोचलो तेव्हा तिथलं वातावरण अगदी शोकाकुळ झालं होतं. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळत होते आणि हृदयात वेदना जी प्रकर्षाने त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. कविता ताईंच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी आता आयुष्यभर जाणवेल ह्याची हळहळ इथं उपस्थित प्रत्येकाला वाटत होती कारण इथं आलेला प्रत्येक माणूस हा कविता ताईंचा ऋणी होता. असे ऋण ज्याची परतफेड कधीच होऊ शकत नाही. निदान ह्या जन्मी तरी नाही.
कविता देशपांडे म्हणजेच माझ्या लाडक्या कविता ताई. हे रसायनच मुळी वेगळं होतं. गेली जवळपास २० वर्षे त्या निस्वार्थ मनाने समाजसेवा करत होत्या. कित्येकांना त्यांनी रोजगार मिळवून दिला तर अनेकांच्या विसकटलेल्या संसाराची घडी पुन्हा व्यवस्थित बसविण्यात त्यांनी मदत केली. ज्यांची घरं उध्वस्त झाली त्यांना पुन्हा खंबीरपणे उभे राहण्याचे बळ दिले तेही ह्यांनीच. त्यांना त्यांच्या कामात मदत करायची संधी मला अनेकदा लाभली. त्यांच्या सोबत काम करायची मज्जा काही और होती.
रमेश भाऊ हे त्यांचे अगदी जुने सहकारी. त्यांना ही अश्रू अनावर झाले होते. ते गहीवरले. बोलताना त्यांचा आवाज कापत होता. "ताई गेल्या रे..ताई गेल्या..आपल्याला सोडून..कायमच्या.."
अंगावर काटा आला.माझ्या पायाखालची जमीन सरखली होती तरीही भाऊंना धीर देत मी म्हणालो,"कसं झालं ?"
तेव्हा हुंदका गिळून ते म्हणाले, "ताई काही आश्रमांना मदत करून घरी परत येत होत्या. रस्ता क्रॉस करत असताना सिग्नल तोडून येणाऱ्या एका भरधाव मोटर सायकलीने त्यांना धडक दिली. रक्ताच्या थारोळ्यात ताई पडल्या होत्या. मदतीसाठी हाका मारत होत्या. बघ्यांची गर्दी जमली पण मदतीसाठी एकही हाथ पुढं सरसावला नाही आणि त्यांनी तिथेच आपले प्राण सोडले.." हे सांगताना भाऊ कोसळले. मीही दोन पावलं मागे गेलो. मनात विचार आला की ज्या बाईने आपले संपूर्ण आयुष्य लोकांच्या मदतीसाठी खर्ची केले त्या बाईला असं मरण यावं? एखाद्या बेवारश्या सारखं?
ही घटना म्हणजे माणूसकीला काळीमा. खरंच विचार करायला लावणारी. ह्या घटनेने एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली की समाजात माणसं तर खूप आहेत पण माणूसकी नाही. या गोष्टीची खरंच खंत वाटते.
कविता ताई तर गेल्या पण माझ्या सारख्या अनेकांना हा वारसा पुढे नेण्यासाठी प्रेरित करून.त्या नेहमी म्हणायच्या समाज सुधारणेसाठी प्रयत्न करत राहवा कारण बदल नक्कीच होणार. त्यांचं म्हणणं बरोबर आहे कारण कुठल्याही अपेक्षा न बाळगता केलेल्या कार्यात अपेक्षा भंग होण्याची भीती नसते. असतो तो फक्त उच्च कोटीचा आनंद. आमचं मार्गदर्शन करायला आमच्या कविता ताई आहेतच. त्याही आहेत ह्या अथांग आसमंतात आम्हाला आशीर्वाद द्यायला..


- निनाद वाघ

No comments: